Gajanan Kirtikar expressed his clear opinion on the MNS-Thackeray group alliance


मनसे – ठाकरे गटाबाबत राज्यातील अन्य पक्षामधील नेते मत व्यक्त करत असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत कीर्तिकरांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसोबतच जनसामान्यांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येऊही लागले आहेत. पण उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्याकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण या युतीबाबत आता इतर पक्षातील नेतेमंडळीही मत व्यक्त करू लागले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनीही याबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. आता दोन्ही बंधूंनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे कीर्तिकरांनी म्हटले आहे. (Gajanan Kirtikar expressed his clear opinion on the MNS-Thackeray group alliance)

माजी खासदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शनिवारी (ता. 7 जून) एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबतही विचारणा करण्यात आली. त्याला उत्तर देताना गजानन कीर्तिकर म्हणाले की, राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही इच्छा राज्यातील सर्व शिवसैनिकांची आहे. बाळासाहेबांचीही होती. दोन्ही बंधू त्यांच्याकडे कॅडर आहे, फक्त एवढंच आहे की त्यांचा जनाधार तेवढा राहिला नाही. बाळासाहेबांच्या वेळेला जो जनाधार होता, तो आता राहिला नाही. पण कॅडर आहे. बाळासाहेबांच्यापासून शिवसेनेत नेतृत्व करणारे हे आमचे दोन युवा नेते. त्यांनी एकत्र यावे ही केवळ माझीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आंकाक्षा आहे, असे कीर्तिकरांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

हेही वाचा… Maharashtra Politics : शिंदेंची सेना ही भाजपाप्रणित, शिवसेनेतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

तर, आम्ही केवळ इच्छाच व्यक्त करतो. त्यांनी एकत्र यावे. शिवसेनेचे जे विभाजन झाले. शिंदे एका बाजूला उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूला. त्यामुळे शिवसेनेचे खूप मोठे नुकसान झाले. आज दोन बंधू एकत्र येणे गरजेचे आहेच. पण त्याचबरोबर बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. तेही या युतीत आले पाहिजे आणि बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना तयार झाली पाहिजे, ही आमची मनोमन इच्छा असल्याचे कीर्तिकरांनी यावेळी म्हटले. दोन बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड टिकेल. शिवसेनेचे विभाजन झाले. त्याचा गैरफायदा राजकारणात घेतला गेला. त्यासाठी ठाकरे ब्रँड पुन्हा अवतरला पाहिजे. अजूनही जुने शिवसैनिक आहेत. दोन ठाकरे एकत्र आले तर त्यांच्या मागे राज्यातील शिवसैनिक उभे राहतील, असा विश्वासही माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला आहे.



Source link

Comments are closed.