मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर, फडणवीस मुख्यमंत्री, म्हणूनच ते निवडणूक आयोगाची पाठराखण करतात – हर्षवर्धन सपकाळ

देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोटाळे करण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला अनुकूल नावे समाविष्ट करणे व विरोधांना अनुकुल असलेल्यांची नावे वगळणे, एकाच घरात ८० किंवा १०० मतदार, घर नंबर नसलेल्यांची नावे, वयांमध्ये फेरफार असे अनेक प्रकारचे गोंधळ या यादीत आहेत. मतदारांची वाढलेली संख्या ही सुद्धा अनाकलनीय आहे. याचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केलेले असताना निवडणूक आयोगाकडून जी उत्तरे दिली जात आहेत ती समाधानकारक नाहीत व पटणारीही नाहीत. निवडणूक आयोगाची भूमिका कठपुतली बाहुल्यासारखी आहे. निवडणूक आयोगाचा कारभार पहाता त्यांच्याविरोधात मोर्चा काढण्याची तयारी केली जात आहे आणि तसा निर्णय झाला तर काँग्रेस पक्ष त्याचे समर्थन करेल.”

पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण..

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडप करण्याचा प्रकार युवक काँग्रेसने उघड केला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. या जमीन व्यवहारात धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून तत्काळ परवानग्या देण्यात आल्या, हे धर्मादाय आयुक्त व मुख्यमंत्री यांचे निकटचे संबंध असल्याचे दिसत आहे तर बँकेकडून एकाच दिवसात कर्जही मंजूर करण्यात आले. मोहोळ हे भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पुण्यातील हा जमीन व्यवहार रद्द केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असे सपकाळ म्हणाले.

Comments are closed.