राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत – हर्षवर्धन सपकाळ
राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही तमा न बाळगता लढत आहेत. स्वतःच्या जिवाला धोका असतानाही कन्याकुमारी ते कश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी हजारो किलोमिटरची पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ व ‘डरो मत’चा संदेश त्यांनी जनतेला दिला आहे. भाजप धमकी देणारा व पाठीत वार करणारा पक्ष आहे. राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे एका न्यायालयीन प्रकरणासंदर्भात भिवंडी येथे जाताना मुंबई विमानतळावर आले असता काँग्रेस नेते व पदाधिकारी-यांकडून त्यांचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, मुंबई युवक काँग्रसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत शंभरपेक्षा अधिकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबदद्ल अपमानकारक विधाने केली आहेत, त्यांचा निषेध करण्याचे धाडस भाजपने करून दाखवावे. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना युद्धविरामची घोषणा अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली? देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा अमेरिकेबरोबरचा व्यापार करार दबावाखाली का केला? डोनाल्ड ट्रम्प भारताची दररोज बदनामी करत असून आपल्या देशाच्या अब्रुची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली आहेत, त्याची काळजी भाजपने करावी. राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन करून भाजप स्वतःचेच हसे करून घेत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Comments are closed.