जुम्मापट्टीपर्यंत चार किलोमीटरचा खडतर प्रवास, माथेरानच्या आसलवाडीतील आजारी वृद्धाच्या नाशिबी ‘झोळी

देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली तरी निसर्गरम्य माथेरानच्या कुशीत वसलेल्या आसलवाडीतील आदिवासींची फरफट सुरूच आहे. या गावात ना रस्ता ना आरोग्य सुविधा. त्यामुळे सोमवारी एका आजारी वृद्धाला आसलवाडी ते जुम्मापट्टीपर्यंत तब्बल चार किलोमीटरचा प्रवास ऐन पावसाळ्यात चिखल तुडवत करावा लागला. नेरळच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र आदिवासींच्या नशिबी वर्षानुवर्षे असलेली ‘झोळी यात्रा’ थांबणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.

जुम्मापट्टीपासून चार किलोमीटरपर्यंत आसलवाडी असून तिथे आदिवासींची अंदाजे दीडशे घरे आहेत. या वाडीमध्ये चांगला रस्ता नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक सुविधादेखील उपलब्ध नाहीत. विशेषतः पावसाळ्यात आदिवासींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सोमवारी मधु पारधी (65) या वृद्धाला थंडी, ताप आल्याने प्रचंड त्रास सुरू झाला. अशक्तपणा असल्यामुळे त्याला चालताही येईना. रुग्णालयात न्यायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला. अखेर वाडीतील रहिवाशांनी झोळी करून जुम्मापट्टीपर्यंत पारधी यांना नेले

एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलेला रस्ता कागदावरच

माथेरान व परिसरातील 12 आदिवासी वाड्यांना जोडणारा राज्यमार्ग क्रमांक 76 बांधण्यात येणार आहे. त्यात आसलवाडीचाही समावेश असून त्यासाठी 14 कोटी 80 लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला. एवढेच नव्हे तर दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या राज्यमार्गाचे ऑनलाइन उद्घाटन केले. पण प्रत्यक्षात या रस्त्याचे काम अजूनही सुरू झालेले नाही. आम्हाला फक्त गाजर दाखवले काय, असा थेट सवाल आदिवासींनी केला आहे.

Comments are closed.