Rajapur News – राजापुरात अर्जुना-कोदवली नद्या धोक्याच्या पातळीवर; बाजारपेठेत पुराचा धोका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला दोन्ही बाजूंनी वेढा घालून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या भागात प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास राजापूर शहरातील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपला मौल्यवान माल, किराणा साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच इतर सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू केली आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान-मोठे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील काही रस्त्यांवरही पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

दुसरीकडे, या दमदार पावसामुळे भात लागवडीसह खरीप हंगामाला मोठा आधार मिळाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आता शेतीच्या कामात जोमाने गुंतले असून यंदा चांगल्या उत्पादनाची आशा व्यक्त करत आहेत. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राजापुरात सध्या सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे एकीकडे शेतीला संजीवनी मिळाली असली, तरी दुसरीकडे संभाव्य पूरस्थितीचे संकटही गडद होत असल्याने प्रशासन, व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. पुढील काही तासांतील पावसाचा जोर आणि नदीपात्रातील पाणीपातळी यावर परिस्थिती अवलंबून राहणार आहे.

Comments are closed.