Hindi issue ignites, MNS leader Sandeep Deshpande controversial statement regarding MLAs
मुंबई : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात त्रिभाषी सूत्र अनिवार्य करण्यात आले. त्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली. पण त्याला कडाडून विरोध झाल्यावर सरकारने एक पाऊल मागे घेतले. आता नवा जीआर जारी करून मराठी आणि इंग्रजी सक्तीची तर, तिसरी भाषा पर्यायी ठेवली आहे. पण मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी अप्रत्यक्षपणे ही हिंदीचीच सक्ती आहे. राज्य सरकारने हिंदी भाषेबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विधीमंडळातील आमदारांसाठी वादग्रस्त शब्दाचा वापर केला आहे. ज्यानंतर त्यांच्या विधानाविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे शिंदेंच्या नेत्याने म्हटले आहे. (Language Controversy: Hindi issue ignites, MNS leader Sandeep Deshpande controversial statement regarding MLAs)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शासनाच्या हिंदी भाषेच्या मुद्द्याला विरोध करत मराठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज भारतीय संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्षे पूर्ण झाल्याने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पण या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या फलकावर केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिण्यात आले होते. त्यामुळे या मुद्द्यावरूनही वाद पेटणार आहे. कारण विधानभवनात झालेल्या कार्यक्रमावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आमदारांचा ‘षंढ’ असा उल्लेख केला आहे. याबाबत बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “सर्व मराठी माणसांना आमचे आव्हान आहे, तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा. सरकारमध्ये सर्व षंढ लोक बसले असतील तर मराठी माणसाने करायचे काय?” असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की, सरकारला अजूनही हिंदीबद्दल का प्रेम आहे हे कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिले आहे. हे तुम्ही विसरू नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे, असेही देशपांडे यांनी म्हटले. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या सह्यांच्या मोहिमेला बघायला मिळतोय. महाराष्ट्रातल्या दोन भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको. बैठकीमध्ये सरकारने याबाबतचा सकारात्मक निर्णय घ्यावा, सध्या तसा सकारात्मक जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याच रस्त्यावर उतरून आम्ही तांडव करायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरणे सरकारला कठीण होईल, असा इशाराही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
देशपांडेंवर हक्कभंग आणणार…
विधानभवनात झालेल्या कार्यक्रमावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आमदारांचा ‘षंढ’ असा उल्लेख केला आहे. यावर आता सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, आपल्या राज्याचे सभागृहाचे ते सदस्य होते. विशेष म्हणजे आज आपल्या सभागृहामध्ये देशाचे लोकसभा अध्यक्ष आले होते. त्यांनाही षंढ म्हणणे उचित आहे का? जे सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बसले आहेत किंवा आमच्यासारखे जे सभासद आहेत, ते षंढ आहेत का? असा सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.
हे बोलणे उचित नाही. आम्हालाही बोलता येते. पण, आम्ही बोलणार नाही. पण जेव्हा मोकळे मैदान येईल, तेव्हा आम्ही बोलून दाखवू. पण एखाद्या व्यासपीठावर आपली बाजू मांडणे आणि कोणाला षंढ म्हणणे याच्याने त्यांना हुशारकी वाटत असेल तर मग खालच्या पातळीवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात. हा सभगृहाचा अपमान आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बरेचशे आमदार यावर हक्कभंग आणल्याशिवाय आणि देशपांडेंना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Comments are closed.