T20WC2026: वर्ल्ड कपमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी; 3 दिवसांत 3 शतके झळकावून फलंदाजांनी बदलला इतिहास

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये काहीतरी असं पाहायला मिळालं आहे, जे स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. या स्पर्धेत फलंदाजांनी असा धमाका केला आहे की संपूर्ण इतिहासच बदलून गेला. अवघ्या तीन दिवसांच्या आत तीन वेगवेगळ्या देशांच्या फलंदाजांनी शतकं ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन फलंदाजांनी शतके झळकावली आहेत.
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वात आधी 16 फेब्रुवारीला श्रीलंकेच्या पथुम निसांकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 चेंडूत नाबाद 100 धावा ठोकल्या. त्याच्या पुढच्याच दिवशी, म्हणजेच 17 फेब्रुवारीला कॅनडाच्या तरुण फलंदाजा युवराज सामराने न्यूझीलंडविरुद्ध 110 धावांची स्फोटक खेळी करून सर्वांना थक्क केलं. त्यानंतर 18 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने नामिबियाविरुद्ध 58 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. सलग तीन दिवसांत तीन शतके, असं टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडलं नव्हतं.
रिपोर्ट्सनुसार, या तीन शतकांमुळे टी-20 वर्ल्ड कप 2026 हा आतापर्यंतचा सर्वात जास्त शतके नोंदवणारा हंगाम (Edition) ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही एका आवृत्तीत दोनपेक्षा जास्त शतके झाली नव्हती. 2010, 2014, 2016 आणि 2022 मध्ये केवळ दोन-दोन शतके पाहायला मिळाली होती. पण यावेळी तर अवघ्या तीन दिवसांतच तीन शतके लागली आहेत.
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात आधी ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 2007 च्या हंगामात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकलं होतं. त्यानंतर 2010 मध्ये सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि महेला जयवर्धनेने झिम्बाब्वेविरुद्ध शतके केली होती. 2012 च्या स्पर्धेत न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावलं होतं. 2014 मध्ये इंग्लंडच्या ॲलेक्स हेल्स (विरुद्ध श्रीलंका) आणि पाकिस्तानच्या अहमद शहजाद (विरुद्ध बांगलादेश) यांनी हा कारनामा केला होता.
2016 मध्ये बांगलादेशच्या तमिम इक्बालने (विरुद्ध ओमान) आणि ख्रिस गेलने (विरुद्ध इंग्लंड) शतके केली होती. 2021 मध्ये इंग्लंडच्या जोस बटलरने (विरुद्ध श्रीलंका), तर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या रिली रोसौवने (विरुद्ध बांगलादेश) आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने (विरुद्ध श्रीलंका) शतके झळकावली होती. विशेष म्हणजे, 2009 चा टी-20 वर्ल्ड कप हा असा एकमेव हंगाम होता, ज्यामध्ये एकही शतक झालं नव्हतं. त्या वर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत पाकिस्तानने श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावलं होतं.
Comments are closed.