मोठी बातमी : बांगलादेशला ICC चा 440 व्होल्टचा झटका, वर्ल्डकपमधून हाकलून दुसरा पर्यायी संघ पाठवण
बांगलादेश T20 विश्वचषक 2026 सहभागाच्या बातम्या : आगामी 2026 टी-20 विश्वचषकाबाबत क्रीडा जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जर बांगलादेश क्रिकेट संघाने (BCB) भारतात येऊन सामने खेळण्यास नकार दिला, तर त्यांना या स्पर्धेतून बाहेर काढले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बोर्ड बैठकीत यासंदर्भात एक निर्णय झाला असून, बहुमताने बांगलादेशच्या जागी दुसऱ्या संघाला संधी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
2026 चा टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. मात्र, राजकीय किंवा सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश संघाने भारतात प्रवास करण्यास आणि तिथे सामने खेळण्यास अद्याप संमती दिलेली नाही. आयसीसीने आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) कडक शब्दांत सुनावले असून, या प्रकरणावर आपल्या सरकारशी चर्चा करून अंतिम निर्णय कळवण्यासाठी फक्त एका दिवसाची मुदत दिली आहे.
आयसीसी बोर्डाचा मोठा निर्णय
आयसीसीच्या बैठकीत झालेल्या मतदानानुसार, जर बांगलादेशने आपला निर्णय बदलला नाही, तर स्पर्धेचे वेळापत्रक विस्कळीत होऊ नये म्हणून त्यांच्या जागी त्वरित पर्यायी संघाचा समावेश केला जाईल. बहुतांश सदस्य देशांनी या प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला आहे.
🚨BREAKING🚨
आयसीसीने त्यांचे स्थलांतर करण्याची बीसीबीची विनंती फेटाळली आहे #T20WorldCup2026 भारताबाहेरचे सामने.
बीसीबीने त्यांच्या सहभागाची पुष्टी करण्यासाठी 24 तास दिले आहेत. बांगलादेशने खेळण्यास नकार दिल्यास, आयसीसी त्यांच्या जागी दुसरा संघ निवडेल, बहुधा स्कॉटलंड. pic.twitter.com/p26hmSGwLv
— Cricbuzz (@cricbuzz) 21 जानेवारी 2026
स्कॉटलंडचे नशीब उजळणार?
जर बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडला, तर स्कॉटलंडला ‘ग्रुप सी’ मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, स्कॉटलंडचा संघ युरोपियन पात्रता फेरीत नेदरलँड्स, इटली आणि जर्सी यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर राहिल्यामुळे या विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नव्हता. मात्र, आता बांगलादेशच्या भूमिकेमुळे स्कॉटलंडला अनपेक्षितपणे विश्वचषकाचे तिकीट मिळू शकते. बांगलादेशला उद्यापर्यंत आपला अंतिम निर्णय आयसीसीला कळवावा लागणार आहे. त्यांच्या निर्णयावरच आता ‘ग्रुप सी’ मधील संघांचे भवितव्य अवलंबून असेल.
बीसीबीने व्यक्त केली सुरक्षेची चिंता
बांगलादेश क्रिकेट बोर्ड सुरक्षेच्या कारणास्तव 2026 चा टी-20 विश्वचषक भारतात खेळण्यास नकार देत आहे. बीसीबीने सामने भारतातून श्रीलंका किंवा पाकिस्तानमध्ये हलवण्याची मागणी केली होती. पण, आयसीसीने सामने हलवण्याची शक्यता नाकारली आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.