IND vs ENG: हेडिंग्ले टेस्टमध्ये कोण आघाडीवर? चौथ्या दिवशी पावसाचा अडथळा येणार का?

लीड्स येथे भारत व इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. या सामन्यात आतापर्यंत अनेकदा पावसाने खेळ थांबवला असून चौथ्या दिवशी हवामान कसे राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसामुळे सामना पुन्हा बिघडेल का? सामना भरवशाचा चालू राहिला तर भारताने इंग्लंडसमोर किती लक्ष्य ठेवावे यासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या आहेत. चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

चौथ्या दिवशी लीड्समध्ये पावसाची शक्यता खूपच कमी आहे. स्थानिक वेळेनुसार सामना सकाळी 11वाजता सुरु होणार आहे. Accuweather च्या अंदाजानुसार सकाळी 7 पर्यंत थोडा पाऊस होऊ शकतो, मात्र सामन्याच्या वेळेत पावसाचा कोणताही मोठा इशारा नाही. त्यामुळे खेळ पूर्णवेळ होण्याची शक्यता आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने केवळ 3 गडी गमावून 359 धावा केल्या होत्या आणि सामना भारताच्या बाजूला झुकलेला वाटत होता. मात्र दुसऱ्या दिवशी इंग्लंडने अवघ्या 41 धावांत भारताचे 7 गडी बाद करत 471 धावांवर भारताचा पहिली डाव संपवला. त्यानंतर इंग्लंडने तिसऱ्या दिवसाअखेरीस 465 धावा केल्या.

सध्या भारताने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 90 धावा केल्या असून 96 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे सामना सध्या दोन्ही संघांच्या नियंत्रणात आहे असे म्हणता येईल. चौथा दिवस सामन्याचा टोन निश्चित करणारा ठरेल.

जर भारत पूर्ण चौथा दिवस फलंदाजी करत 350 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतो, तर सामना भारताच्या हातात येईल. पण जर इंग्लंडने लवकर विकेट्स घेतल्या, तर इंग्लंडला वरचढी मिळू शकते.

इतिहास सांगतो की हेडिंग्लेवर 400 धावांचे लक्ष्यही खूपसे सुरक्षित नाही. 1948 मध्ये ऑस्ट्रेलियाने येथे इंग्लंडविरुद्ध 404 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले होते. याशिवाय 21व्या शतकात या मैदानावर 5 वेळा 250+, 3 वेळा 300+, आणि एकदा 350+ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे भारताने 400च्याही पुढे लक्ष नेणे गरजेचे ठरू शकते.

Comments are closed.