क्रिकेटवारी – अर्धी लढाई जिंकल्यासारखी!

>> संजय खडे

विजय हजारे, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, विराट कोहली – व्वा! काय नामावली आहे!! पाचवा शुभमन गिल. कप्तान म्हणून पहिल्याच कसोटीत शतक! यापैकी, गावसकर (न्यूझीलंड), कोहली (ऑस्ट्रेलिया) आणि गिल (इंग्लंड). हा पराक्रम मोठा आहे. आता, हजारेंचा 164 नाबादचा विक्रम गिल मोडू शकला नाही हा मुद्दा वेगळा. पण त्यासाठी त्याचा अती बचावात्मक पवित्रा त्याला नडला ही गोष्ट वेगळी.

मात्र, उपकप्तान रिषभ पंतने आपले शतक साजरे करताना एकहाती मारलेला षटकार केवळ कौतुकास्पद होता! तो म्हणतो, उपकप्तान झालो तरी मी बदललेलो नाही. पण त्याची ही फलंदाजीची पद्धत मला आवडली. असा पंत भारतीय क्रिकेटला हवा आहे. बचाव आणि आक्रमकता याचा अप्रतिम संगम त्याने दाखवला. दोस्तांनो, पंतला हलक्यात नका घेऊ. तो मोठा, उच्च दर्जाचा फलंदाज आहे. त्याच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत.

अर्थात, भारताची 471ची धावसंख्या किंचित अपुरी वाटतेय. साई आणि करुणचं शून्यावर बाद होणं सोडलं तरी श्रेयस अय्यरची अनुपस्थिती विसरता येणार नाही. इथे थोडी गल्लत झालीच. मालिकेच्या शेवटी त्याच्यासाठीचा पुकारा मोठा होईल. साई अन् करुणला आणखी संधी मिळेल आणि ते जीव लावतील यात शंका नाही. आशा, प्रयत्न यावर विश्वास ठेवणं आवश्यक ठरेल. इथे खेळ डोक्या-मनाचा असेल!

इंग्लंडचा संघ त्यांच्या घरी खेळतोय. खेळपट्टी शांत दिसतेय. भारतीय जलदगती गोलंदाजांनी आपल्या माऱ्यात तिखट-मीठ घातलं नाही तर झोपी जाणाऱ्या खेळपट्टीवर कुलदीपची उणीव भासेल.

आताच्या क्षणी शुभमन गिल अर्धी लढाई जिंकल्यासारखा दिसतोय. पण गोलंदाजीमध्ये योग्य बदल, क्षेत्ररक्षकांची साथ या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. कसोटी सामना केव्हा अन् कसा कोलांटउडी मारेल याचा नेम नसतो. किंचित ढिलाई आपल्या चेहऱ्यावरचं स्मित बिघडवू शकतं!

शुभमन आणि आपल्या गोलंदाजांना शुभेच्छा!

Comments are closed.