पतौडी यांचा वारसा जपा! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या नामकरणाबाबत तेंडुलकरचे ईसीबी-बीसीसीआयला आवाहन

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे आजवर असलेले पतौडी ट्रॉफी हे नाव बदलून अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफी (एटीटी) असे नामकरण करण्याचा निर्णय ईसीबी-बीसीसीआयने घेतला आहे. मात्र या आगामी मालिकेत महान कसोटीपटू मन्सूर अली खान पतौडी यांचाही वारसा जपावा, असे आवाहन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोन्ही संघटनाना केले आहे. त्यामुळे या मालिकेत पतौडी यांचाही वारसा कसा जपला जाईल आणि त्यांचाही सन्मान कसा राखला जाईल, याबाबत विचार केला जात आहे.
गेल्याच आठवडय़ात ईसीबीने इंग्लंड आणि हिंदुस्थान यांच्यात होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे असलेले पतौडी ट्रॉफी हे नाव निवृत्त करत असल्याची माहिती दिली आणि या मालिकेसाठी इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अॅण्डरसन आणि हिंदुस्थानचा विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यांचे नाव दिले जाणार असल्याची माहिती दिली होती. मात्र या नामांतराबाबत काही दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले. नाव बदलण्याची गरज आहे का? नाव का बदलले जात आहे? त्यामुळे या नामकरणाला काहीसा सौम्य प्रतिसाद लाभला होता. अखेर सचिनने या नामकरणप्रकरणी हस्तक्षेप केल्यामुळे ईसीबी
आणि बीसीसीआय आता पतौडी यांचे नाव अबाधित राखण्यास ईसीबीला पुनर्विचार करण्यास भाग पडले आहे.
पतौडी यांच्या सन्मानार्थ पदक ?
सचिनच्या हस्तक्षेपानंतर आणि आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्या सहकार्यामुळे मन्सूर अली खान यांचाही सन्मान मालिकेत ठेवला जाणार असून विजेत्या कर्णधाराला दिले जाणारे पदक त्यांच्या नावाने दिले जाणार असल्याचे ईसीबीच्या सूत्राकडून कळले आहे.
एटीटीचे अनावरण पुढे ढकलले
सचिन तेंडुलकरचे आवाहन आणि तसेच अहमदाबाद येथे झालेला दुर्दैवी विमान अपघात त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या चौथ्या दिवशी लॉर्ड्सवर अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा अनावरण सोहळाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता तो कधी केला जाईल, याबाबत ईसीबीकडून लवकरच कळविले जाईल.
Comments are closed.