IND vs ENG Test Series: नवा कॅप्टन, इंग्लंडचं मिशन!
आयएनडी वि इंजिन टेस्ट मालिका: नवा दौरा, नवी मालिका आणि नवा कर्णधार. चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाच्या मखमली आठवणी मनात ठेवून आपण इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवलंय ते पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी . अर्थात आयपीएलचा एन्टरटेन्मेंट तडका मध्ये होऊन गेला. आता वेळ झालीय क्रिकेटच्या पारंपरिक फॉरमॅटची, कसोटी क्रिकेटची. या क्रिकेट फॉरमॅटच्या नावातच कसोटी असल्याने खेळाडूंचा कस पाहणारे आणि परीक्षा घेणारे हे सामने असतील यात शंका नाही. त्यात ही मालिका अनेक अर्थाने भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे. रोहित आणि विराटने या मालिकेआधीच कसोटी क्रिकेटमध्ये बॅट म्यान करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही वर्षांमधल्या कसोटी संघाचा विचार केल्यास सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण, गांगुली आणि आता विराट, रोहित या दिग्गज फलंदाजांशिवाय भारतीय टीम कसोटीच्या मैदानात उतरणार आहे. लीड्सच्या मैदानात या लढाईला शुक्रवारपासून तोंड फुटेल. त्यात शुभमन गिलसारख्या युवा शिलेदाराकडे संघाची नेतृत्वाची कमान सोपवण्यात आलीय. आपल्या फलंदाजीतील गुणवत्तेचं दर्शन त्याने वेळोवेळी घडवलंय. पण, कसोटीच्या मैदानात युवा संघाचं नेतृत्व करत इंग्लंडशी त्यांच्याच भूमीत दोन हात करण्याचं मोठं चॅलेंज त्याच्यासमोर आहे.
या टीममध्ये सर्वाधिक कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा – 80 कसोटी, राहुल – 58 कसोटी तर ऋषभ पंत – 43 कसोटी अशी आकडेवारी पाहायला मिळते. संघाची फलंदाजीची मदार युवा शिलेदारांवरच आहे. कॅप्टन गिल, सलामीवीर जैस्वाल, तब्बल आठ वर्षांनी टीममध्ये पुनरागमन करणारा त्रिशतकवीर करुण नायर, के.एल. राहुल हे बॅटिंगची प्रमुख धुरा सांभाळतील. साई सुदर्शनच्या रुपात डावखुरा युवा प्रतिभावान फलंदाज आपल्या ताफ्यात आहे. ज्याने आयपीएलचं मैदान चांगलंच गाजवलंय. ऋषभ पंतसारखा एक्स फॅक्टर असणारा तडाखेबाज बॅट्समनही आपल्याकडे आहे. मैदान कसोटी क्रिकेटचं, पाच दिवसांच्या क्रिकेटचं असलं तरीही आक्रमकतेचा वसा घेऊनच पंतसारखा फलंदाज मैदानात उतरत असतो. तशीच आक्रमकता दाखवताना त्याच्यासह इतर फलंदाजांना इंग्लिश वातावरण, खेळपट्ट्या आणि उंचपुऱ्या इंग्लिश वेगवान माऱ्याचा सामना करावा लागणार आहे. स्विंगला पोषक हवामानात भारताच्या आघाडीच्या फळीचं टेक्निक आणि टेम्परामेंटची इथे कठीण परीक्षा होेईल हे नक्की. त्यात गेल्या दोन कसोटी मालिकांमधली भारताची 0-3 आणि 1-3 नं पराभव ही कामगिरी अस्वस्थ करणारी आहे.
किवींविरुद्ध मायदेशात तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मैदानात झालेली मालिका या दोन्हींमध्ये भारताला तोंडावर पाडलं त्यांच्या अवसानघातकी फलंदाजीने. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील सहा इनिंगमध्ये भारताच्या धावा होत्या 263,121, 156, 245 तसंच 46 आणि 462. सहापैकी एकमेव इनिंगचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजीने तीनशेचा टप्पाही ओलांडला नव्हता. आपला संघ दोनशेच्या आत तर एकदा 100 च्या आत तंबूत परतला. फलंदाजीच्या हाराकिरीतील हीच बाब ऑसी दौऱ्यातही समोर आली. कांगारूंच्या भूमीवरील पाच कसोटी सामन्यांमधल्या 10 डावांमध्ये 150, 487, 180, 175, 260, बिनबाद 8, 369, 155, 185, 157 असा स्कोअर आपल्या टीमच्या नावावर आहे. इथेही 10 डावांमध्ये फक्त एकदाच साडेचारशेचा टप्पा पार. तर, सहा डावात दोनशेचा टप्पाही पार नाही. कसोटी सामने जिंकायचे असतील तुमच्या फलंदाजांना धावा कराव्याच लागतात. खास करुन मॅचची पहिली इनिंग सामन्याचा टोन सेट करत असते. त्या मालिकेतही भारतीय फलंदाजी वारंवार कोसळतानाच पाहायला मिळाली. तिथेच आपण बॅकफूटवर गेलो. सचिनसह ज्या तगड्या फलंदाजांचा वारसा आपल्याला लाभलाय, त्यावेळचे कसोटी सामने आठवा, आपण मोठमोठे स्कोअर करुन प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणत होतो. आपल्याकडे खेळपट्टीवर तासन तास उभं राहून खिंड लढवणारे द्रविड, लक्ष्मण, सचिन अगदी सध्याचा टीमचा कोच असलेल्या गौतम गंभीरसारखे खंदे फलंदाज होते. काळानुरुप खेळाचा नूर बदलला. टी-ट्वेन्टी युग सुरु झालं. कसोटी सामने निकाली ठरण्याचं प्रमाण वाढू लागलं त्याच वेळी फलंदाजांकडचा संयम, खेळपट्टीवर नांगर टाकण्याची वृत्ती दुर्मिळ होत गेली. पाच दिवसांचे सामने तीन दिवसातच संपू लागले. आपल्याला या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला कडवी लढत द्यायची असेल तर कसोटी क्रिकेटच्या पारंपरिक खेळाची कास धरावी लागेल. खास करुन फलंदाजांना तलवारी चांगल्याच परजून घ्याव्या लागतील.
इथल्या वातावरणासाठी, खेळपट्टीसाठी सक्षम अशी गोलंदाजीची फळीही आपल्याकडे आहे. बुमरा, सिराज, कृष्णा, शार्दूल ठाकूर, डावखुरा अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाज तर, नितीश रेड्डीसारखा ऑलराऊंडर, जडेजा, कुलदीप आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे फिरकीपटू आपल्या गोलंदाजीतलं वैविध्य दाखवून देतात. बुमराच्या फिटनेसवरही तो किती सामने खेळणार हे अवलंबून असेल. असं असलं तरीही तो चॅम्पियन गोलंदाज आहे. समोरची फलंदाजी कापून काढण्याची कुवत त्याच्यात आहे. अर्थात डकेट, क्राऊली, रूट, ब्रुक, बेन स्टोक्स अशा तगड्या फलंदाजांचा भरणा असलेल्या इंग्लिश आर्मीला मायदेशात खेळतानाचा फायदा होईलच. तरीही बुमराला दुसऱ्या बाजूने समर्थ साथ लाभली तर इंग्लंडच्या बॅटिंगला आपण टेन्शन देऊ शकतो. आपल्या गोलंदाजीत यजमानांना टिपिकल इंग्लिश वातावरणात घाम फोडण्याची ताकद आणि कुवत नक्कीच आहे. टॉसचं दान अन् त्याहीपेक्षा पहिल्या डावातील स्कोअर सामन्याची दिशा ठरवणारा असेल. विराट, रोहितसारखे ग्रेट खेळाडू आणि मोठ्या कॅप्टन्ससोबत टीममध्ये एकत्र खेळल्याने शुभमनला युक्तीच्या चार गोष्टी या दोघांनीही नक्कीच सांगितल्या असतील. असं असलं तरीही प्रत्यक्षात मैदानात उतरुन इंग्लंडला त्यांच्याच भूमीत भिडण्याची अग्निपरीक्षा शुभमनला द्यायचीय. यासाठी त्याला आणि त्याच्या टीमला ऑल द बेस्ट.
Comments are closed.