भारत-पाकिस्तानमध्ये उपांत्य फेरीत होणार सामना! श्रीलंका मालिकेनंतर ‘या’ स्पर्धेत आमनेसामने येणार दोन्ही संघ
टीम इंडिया (Team india) साधारण 2 महिन्यांनंतर जपानला जाईल, जिथे ते आशियाई खेळांमध्ये (Asian Games) सुवर्णपदकासाठी आपली दावेदारी सादर करतील. आशियाई खेळ 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जाणार असून, त्यासाठीचे क्रिकेटचे वेळापत्रक समोर आले आहे. मात्र, चाहत्यांना भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan) सामन्याची उत्सुकता लागली असणार आहे.
पुरुष आणि महिला स्पर्धेचे आशियाई खेळांमधील वेळापत्रक जाहीर झाले आहे, परंतु भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित झालेला नाही. हे दोन्ही शेजारी देश केवळ एकाच परिस्थितीत आशियाई खेळांमध्ये आमनेसामने येऊ शकतात.
महिला स्पर्धेची सुरुवात थेट उपांत्यपूर्व (Quarterfinal) सामन्यांपासून होईल; तर पुरुष स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ टॉप-सीड असून या चारही संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे.
आशियाई खेळांमधील पुरुषांच्या वेळापत्रकाचा विचार केला, तर भारत आणि पाकिस्तान केवळ उपांत्य फेरीत (Semifinal) आमनेसामने येऊ शकतात. जर दोन्ही संघांनी आपापले उपांत्यपूर्व सामने जिंकले, तर त्यांची गाठ 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत पडू शकते. दुसरीकडे, महिला स्पर्धेच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास, उपांत्यपूर्व फेरीच्या ब्रॅकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानला अशा प्रकारे स्थान दिले गेले आहे की, अंतिम सामन्यापूर्वी (Final) त्यांची गाठ पडणे शक्य नाही.
भारतीय आणि पाकिस्तानी महिला क्रिकेट संघ आपापले उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामने जिंकून 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात आमनेसामने येऊ शकतात.
क्रिकेटचा 2010 मध्ये प्रथमच आशियाई खेळांमध्ये समावेश करण्यात आला होता. भारताने 2010 आणि 2014 च्या आशियाई खेळांमधील क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता, तर 2018 च्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला नव्हता. 2022 च्या आशियाई खेळांमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धांमधील सुवर्णपदक भारतीय संघाने आपल्या नावावर केले होते. भारताने आतापर्यंत आशियाई खेळांमध्ये दोन पदके जिंकली असून दोन्ही सुवर्णपदके आहेत.
Comments are closed.