भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला ‘फायनलपूर्वीची फायनल’ का म्हटली जातेय? जाणून घ्या प्रमुख कारणं

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडिया रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर-8 फेरीची सुरुवात करणार आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड दिसत असले, तरी दक्षिण आफ्रिकेचा संघही आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. दोन्ही संघांनी आपापले चारही सामने जिंकून ही फेरी गाठल्यामुळे या सामन्याला ‘फायनलपूर्वीची फायनल’ असे म्हटले जात आहे. न्यूझीलंडवर मिळवलेल्या सहज विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला धोक्याची सूचना दिली आहे. या सामन्याला ‘फायनलपूर्वीची फायनल’ का म्हटले जातेय जाणून घ्या.

29 जून 2024 चा तो वर्ल्ड कप फायनलमधील सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) ‘तो’ कॅच दक्षिण आफ्रिकन चाहत्यांच्या मनात अजूनही सलत असेल. त्या फायनलमध्ये भारताने केवळ 7 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ ‘जखमी सिंहा’सारखा असून ते या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज असतील.

2024 च्या फायनलपासून आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 8 टी-20 सामने झाले असून भारताने 6 वेळा आफ्रिकेला धूळ चारली आहे. मात्र, क्रिकेटमध्ये इतिहास कागदावर राहतो आणि सध्याचा फॉर्म जास्त महत्त्वाचा असतो. दोन्ही संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. या सामन्यात जो संघ जिंकेल, त्याला केवळ गुणच मिळणार नाहीत, तर एक मानसिक बळही मिळेल. अहमदाबादमध्ये भारताचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे, पण जो संघ येथे जिंकेल त्याला (जर संघ पोहोचला तर) नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या सेमीफायनलमध्ये या अनुभवाचा मोठा फायदा मिळेल.

काळ्या मातीची खेळपट्टी आणि दक्षिण आफ्रिकेने अलीकडच्या काळात काळ्या मातीच्या खेळपट्टीवर स्वतःला चांगले जुळवून घेतले आहे. विशेष म्हणजे ही खेळपट्टी फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांना जास्त मदत करते. यामुळे भारत कदाचित एका फिरकीपटू ऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देऊ शकतो. फिरकी खेळण्याच्या आफ्रिकन खेळाडूंच्या सुधारलेल्या कौशल्यामुळे हा सामना अधिक रोमांचक होणार आहे.

Comments are closed.