Indrayani River Bridge at Kundamala collapsed; Many drowned, six tourists died
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा या ठिकाणी असलेल्या पुलावर अनेक पर्यटक उभे असताना हा पूल तुटला आणि यामध्ये 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सातत्याने वेगवेगळे अपघात घडताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा या ठिकाणी असलेल्या पुलावर अनेक पर्यटक उभे असताना हा पूल तुटला आणि यामध्ये 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात आतापर्यंत दोन पर्यटकांचे मृत्यू झाल्याची माहिती मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून देण्यात आली आहे. (Indrayani River Bridge at Kundamala collapsed; Many drowned, six tourists died)
मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीवरील कुंडमळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. पण हा पूल गेल्या काही दिवसांपासून सुस्थितीत नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. हा पूल कमकुवत झाल्याची तक्रारही येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आणि या पुलावर पर्यटकांची गर्दी वाढल्याने हा पूल आज रविवारी (ता. 15 जून) दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास कोसळला. ज्यामध्ये यावेळी पुलावर असलेले 20 ते 25 जण पाण्यात बुडाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मावळ तालुक्यात आणि इंद्रायणी नदीपात्र परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीतील पाण्यात वाढ झाली आहे.
हेही वाचा… Vijay Rupani : माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटली, विमान अपघातात झाला मृत्यू
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तसेच, एनडीआरएफ पथकही घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. पूल तुटल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत किती लोक वाहून गेले आहेत, याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 20 ते 25 लोक वाहून गेल्याची शक्यता आहे. तर एका मराठी वृत्तवाहिनीशी आमदार सुनील शेळके यांनी संवाद साधला असता या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे, अशी माहिती सुनिल शेळके यांनी दिली आहे.
Comments are closed.