‘एक मिनिटही वाया घालवू…’; आयपीएल 2026 पूर्वी विराट कोहलीचा आरसीबीला अल्टीमेटम, ड्रेसिंग रूममध्ये उडाली खळबळ!

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने आगामी आयपीएल हंगामासाठी आपल्या घरच्या मैदानावर सरावाला सुरुवात केली असून, या सरावात विराट कोहलीदेखील सहभागी झाला आहे. कोहलीने आपल्या सहकाऱ्यांना नव्या हंगामाबाबत इशाराही दिला आहे.
आयपीएल २०२५ हंगामाची ट्रॉफी जिंकलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ आगामी हंगामात आपले विजेतेपद राखू शकेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरसीबी संघाला आपले पहिले आयपीएल विजेतेपद जिंकण्यासाठी तब्बल १८ वर्षे वाट पाहावी लागली, पण आता संघ सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. आरसीबी संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आणि पहिल्या हंगामापासून या फ्रँचायझीचा भाग असलेल्या विराट कोहलीने नवीन हंगामापूर्वी एक मोठे विधान केले आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या सहकाऱ्यांना इशारा दिला आहे की, विजेतेपद टिकवण्यासाठी आपल्याला अधिक चांगल्या तयारीने मैदानात उतरावे लागेल.
आयपीएल २०२६ हंगामाच्या तयारीसाठी आरसीबीने बंगळूरु येथील आपल्या घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सरावाला सुरुवात केली असून, अनेक महत्त्वाचे खेळाडू संघात सामील झाले आहेत. आरसीबीने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या सराव सत्राचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली संघातील इतर खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहे. कोहलीने सर्वांना सांगितले की, आपण गेल्या दोन-तीन हंगामात खूप मेहनत घेतली आहे, म्हणूनच आम्ही गेल्या हंगामात ट्रॉफी जिंकू शकलो. आता त्यांच्यासाठी गोष्टी आणखी कठीण होणार आहेत, कारण इतर संघ आणखी चांगल्या तयारीने मैदानात उतरतील.
विराट कोहलीने सराव सत्रादरम्यान आपल्या सहकाऱ्यांना पुढे सांगितले की, हंगाम सुरू होण्यापूर्वी आपण अजिबात वेळ वाया घालवू शकत नाही. त्यामुळे, आपण आता पूर्णपणे तयार असले पाहिजे. आपण सहभागी होणाऱ्या कोणत्याही सत्रातील एकही मिनिट वाया घालवू नका. या अडीच महिन्यांत आपण आपले १२०% दिले पाहिजेत. मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहू शकतो की, आम्ही या आव्हानासाठी स्वतःला पूर्णपणे तयार करू. आरसीबीचा या हंगामातील पहिला सामना २८ मार्च रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
Comments are closed.