टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर, आयर्लंडकडून भारताचा पहिलावहिला पराभव, श्रेयस अय्यरच्य
आयर्लंडने भारताला पहिल्या वेळी टी20 क्रिकेटमध्ये हरवले: टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एक मोठी उलटफेर पाहायला मिळाली आहे. आयर्लंडने भारतीय संघाला 34 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी कर्णधार म्हणून ही अतिशय निराशाजनक आणि लाजिरवाणी सुरुवात ठरली आहे. आयर्लंडने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 148 धावांवर गारद झाला. या पराभवासोबतच भारताचे आयर्लंडवरील गेल्या 17 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.
17 वर्षांनंतर आयर्लंडचा पहिला विजय
भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 क्रिकेटचा इतिहास पाहिला, तर दोन्ही संघ सर्वप्रथम 2009 मध्ये आमनेसामने आले होते. गेल्या 17 वर्षांत दोन्ही संघ 8 वेळा भिडले होते आणि प्रत्येक वेळी भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला होता. 26 जून 2025 ही तारीख आयर्लंड क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिली जाईल, कारण याच दिवशी त्यांनी भारताला हरवून आपला पराभवाचा दुष्काळ संपवला. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची ही पहिलीच वेळ होती, पण हा सामना त्याच्यासाठी आणि भारतीय चाहत्यांसाठी एक नकोसा ठरणारा अनुभव ठरला.
श्रेयस अय्यरची लाजिरवाणी सुरुवात
टी-20 फॉरमॅटमध्ये एम.एस. धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद भूषवले आहे. श्रेयस अय्यर टी-20 संघाचा पाचवा पूर्णवेळ कर्णधार बनला, पण त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. काही महिन्यांपूर्वीच टी-20 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. अय्यर वैयक्तिकरित्याही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने 7 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा केल्या.
अभिषेक शर्मा वगळता सर्वांनी फलंदाजी फेल…
2026 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरलेल्या भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. आयर्लंडविरुद्ध 183 धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, संजू सॅमसन अवघ्या पाच धावांवर बाद झाला, तर इशान किशन केवळ एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर, कर्णधार म्हणून पहिल्यांदाच फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तोही अवघ्या तीन धावांवर बाद झाला. सलामीवीर अभिषेक शर्माने डावाची एक बाजू सांभाळली आणि 50 धावांवर बाद होण्यापूर्वी आपले अर्धशतक पूर्ण केले. सामन्यात 90 धावांवर भारतीय संघाने पाच गडी गमावले. त्यानंतर, धावगती वाढवण्याच्या दबावाखाली भारतीय संघाच्या विकेट्स पडत राहिल्या आणि 18.5 षटकांत डाव 148 धावांवर संपला.
कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध आपला पहिला विजय मिळवणाऱ्या आयर्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या टी-20 सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यात मॅथ्यू हम्फ्रीज आणि मॅथ्यू हॉलार्ड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. इतकेच नाही, तर आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या भारतीय वंशाच्या आयरिश खेळाडू जय मुंद्रानेही गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले. लियाम मॅकार्थी आणि गॅरेथ डेनाली यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला. या दोन संघांमधील मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना 28 जून रोजी बेलफास्ट स्टेडियमवर खेळला जाईल.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.