‘जास्त विचार करू नका, फक्त…’, 270 धावांची ऐतिहासिक खेळी केल्यानंतर इशान किशनचं मोठं वक्तव्य

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इशान किशनने केलेल्या 270 धावांच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या ऐतिहासिक खेळीनंतर, इशानने केवळ आपल्या खेळाबद्दलच नाही, तर कर्णधारपदामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व आणि क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, यावरही भाष्य केले.
ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने 7 सप्टेंबर रोजी सांगितले की, 2024 मध्ये झारखंडचे कर्णधारपद स्वीकारल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणि खेळात महत्त्वपूर्ण बदल झाले. त्याच्या मते, कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे त्याला एक उत्तम व्यक्ती, क्रिकेटपटू आणि लीडर म्हणून घडण्यास मदत झाली. या दरम्यान आपण आपल्या पूर्वीच्या बेफिकीर शैलीतून बाहेर पडून जबाबदारी स्वीकारायला शिकलो, याची कबुली इशानने दिली.
2023 च्या उत्तरार्धात बीसीसीआयचा (BCCI) केंद्रीय करार गमावल्यानंतर, इशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि झारखंडचे कर्णधारपद स्वीकारले. उपलब्ध असताना त्याने संघाचे नेतृत्व केले. एका आव्हानात्मक टप्प्यातून सावरत इशानने आता भारतीय संघात पुनरागमन केले असून तो मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठीच्या संघात समाविष्ट आहे. या वर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू तो आहे. त्याने 28 सामन्यांत 986 धावा केल्या आहेत.
साउथ झोनविरुद्धच्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचे नेतृत्व करताना इशानने 270 धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे ईस्ट झोनला पहिल्या डावात 708 धावांचा प्रचंड डोंगर उभारता आला. या खेळीनंतर इशानने सांगितले की, संघासाठी धावा करण्याच्या मुख्य जबाबदारीपासून आता त्याला दूर राहायचे नाही.
इशानने स्पष्ट केले की, जेव्हा एखादा खेळाडू तरुण असतो, तेव्हा धावा करण्यासाठी तो अनेकदा वरिष्ठ सहकाऱ्यांवर अवलंबून असतो. मात्र, संघात स्थान पक्के झाल्यावर स्वतःहून जबाबदारी घेणे गरजेचे असते. किशनने पुढे सांगितले की, सध्या तो जी सर्वोत्तम गोष्ट करत आहे ती म्हणजे अतिविचार टाळणे. एक फलंदाज म्हणून त्याचे काम केवळ मैदानात उतरून चेंडूच्या गुणवत्तेनुसार प्रतिक्रिया देणे हे आहे, तो स्वतःकडून कोणतीही विशिष्ट अपेक्षा ठेवत नाही.
Comments are closed.