It is necessary to make arrangements so that tourists can enjoy tourist destinations safely, says NCP SP chief Sharad Pawar in marathi
Sharad Pawar : पुणे : रविवारी पहाटे केदारनाथ येथे खराब हवामानामुळे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील तिघांनी जीव गमावला. त्या दुःखातून बाहेर येत नाही तोच दुपारी पुन्हा एक अपघात घडला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा या ठिकाणी असलेल्या पुलावर अनेक पर्यटक उभे असताना हा पूल तुटला आणि यामध्ये 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या अपघातानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. (it is necessary to make arrangements so that tourists can enjoy tourist destinations safely, says NCP SP chief Sharad Pawar)
मावळच्या कुंडमळानजीक इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेल्याची, जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे, हे अतिशय खेदजनक आहे. उपस्थित पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा आणि NDRF तर्फे बचावकार्य सुरु आहे, त्याद्वारे अनेकांना वाचविण्यात यश यावं तसंच जखमींना यथायोग्य उपचार मिळोत, अशी प्रार्थना करतो, असे शरद पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच या दुर्घटनेत ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटूंबियांप्रती सहवेदना असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मावळच्या कुंडमळानजीक इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेल्याची, जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे, हे अतिशय खेदजनक आहे. उपस्थित पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा व NDRF तर्फे बचावकार्य सुरु आहे, त्याद्वारे अनेकांना वाचविण्यात…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 15, 2025
या नदीचं पात्र विस्तीर्ण आहे, तिथल्या खडकाळ भागात विवरं आहेत आणि एरवी असणारा वेगवान प्रवाह सध्या जरा कमी पाहायला मिळतोय त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी आता शासन, प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी अधिक सतर्क राहणं गरजेचं असल्याचा सल्ला देखील पवार यांनी दिला आहे.
पावसाच्या दिवसांमध्ये रोजच्या दगदगीतून उसंत म्हणून अनेक लोकं अशा पर्जन्य पर्यटनस्थळांना किंवा कधी कधी छुप्या निसर्गरम्य ठिकाणांना (Hidden Places) भेटी देतात, तिथल्या निसर्गाचा आनंद घेतात. अशा वेळी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने, स्थानिक जिल्हा प्रशासनांनी सर्व पर्जन्य पर्यटनस्थळांबाबतीत अधिक जागृत राहणं गरजेचं आहे, पर्यटक सुरक्षितपणे पर्यटनस्थळांचा आनंद घेऊ शकतील, अशा व्यवस्था करणं आवश्यक आहे तरंच भविष्यात अशा अपघात आणि दुर्घटनांना टाळण्यात आपल्याला यश येईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा – Rohit Pawar : एका दुर्घटनेतून वाचत नाही तोच…पूल कोसळल्याच्या दुर्घटनेवरून काय म्हणाले रोहित पवार
कुंडमळा हे इंद्रायणी नदीवरील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी दर रविवारी तसेच सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हा पूल काही दिवसांपासून सुस्थितीत नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. हा पूल कमकुवत झाल्याची तक्रारही येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आणि या पुलावर पर्यटकांची गर्दी वाढल्याने हा पूल आज रविवार (ता. 15 जून) दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास कोसळला. आणि यावेळी पुलावर असलेले 20 ते 25 जण पाण्यात बुडाले.
Comments are closed.