क्रीडा भारती ऑनलाईन क्रीडा ज्ञान परीक्षा: मध्य प्रदेशचा आर्यन गौर अव्वल, सोलापूरच्या ओवी शिंदे-साक्षी कांबळे तिसऱ्या क्रमांकावर
पुणे दिनांक १६ सप्टेंबर, क्रीडा भारती संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय क्रीडा ज्ञान परीक्षेत मध्य प्रदेशातील आर्यन गौरने प्रथम क्रमांकासह एक लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. अलंग देव (उत्तर प्रदेश) व
यशराज सिंग राजपूत (गुजरात) यांना द्वितीय क्रमांकाचे प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
सोलापूरच्या ओवी शिंदे व साक्षी कांबळे तसेच भावना सिंघवी (मध्य प्रदेश), आयुष राज (उत्तराखंड) , वंश गुप्ता (उत्तर प्रदेश), कशिश राणा (उत्तर प्रदेश) यांनी संयुक्तरित्या तिसरे स्थान मिळवले त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सेवासदन पुणे संस्थेच्या सलोनी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर पुणे महानगर विभागात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या मंजरी धोंडीयाल हिने प्रथम स्थान मिळविले.
याच बरोबर देशातील ११ विभागांमध्ये प्रत्येकी ११ हजार रुपयांचे प्रादेशिक पुरस्कार दिले जाणार आहेत.
क्रीडा भारतीचा ” ऑनलाईन क्रीडा ज्ञान परीक्षा २०२५” हा नाविन्यपूर्ण उपक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. आपल्या देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना खेळांशी जोडण्याच्या उद्देशाने क्रीडा भारती १९९२ पासून कार्यरत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी ही ऑनलाइन परीक्षाही घेते. ओपन बुक फॉरमॅट असलेली ही परीक्षा केवळ आव्हानात्मकच नाही तर मनोरंजक देखील आहे. या परीक्षेचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून किंवा मित्रांसह सुद्धा परीक्षा दण्याची सुविधा असते. भारतातील सर्व राज्ये आणि ६२६ जिल्ह्यांमधून २,२८,९९८ तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. आजपर्यंतचा हा विक्रमच आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक ३२ हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या शहरांपैकी जोधपूर (१४,२१४) आणि पुणे (१४,१९१) ही शहरे आघाडीवर होती.
क्रीडा भारतीचे अध्यक्ष गोपाल सैनी, कार्याध्यक्ष चैतन्य कुमार कश्यप, महामंत्री राज चौधरी, संघटन मंत्री प्रसाद महानकर आणि नियामक मंडळ सदस्य विजय पुरंदरे यांच्या उपस्थितीत एका ऑनलाईन कार्यक्रमात या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्या तीन पारितोषिक विजेत्या उमेदवारांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत कार्यक्रमात उपस्थिती लावली आणि मोठ्या उत्साहाने त्यांचे अनुभव सांगितले. या कार्यक्रमात परीक्षेचे तांत्रिक सल्लागार ओपाइन ग्रुपचे आनंद कोल्हारकर आणि अक्षय गावडिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राज चौधरी यांनी परीक्षेची पार्श्वभूमी आणि क्रीडा भारतीची भूमिका स्पष्ट केली. गोपाल सैनी, चैतन्य कुमार कश्यप, प्रसाद महानकर यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षी देशातील तरुणांना जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन केले. परीक्षा समन्वयक श्री विजय राजपूत यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
पश्चिम महाराष्ट्र विभागात सलोनी पाटील (सेवा सदन पुणे), आसावरी म्हेत्रे (निर्मल बेथानी प्रशाला पिंपरी चिंचवड), रूपा सुतार (सहस्त्रार्जुन प्रशाला,सोलापूर), ईशान जमादार (एस एस मालू प्रशाला, हरिपूर), यश लबडे (पंढरपूर) यांनी अनुक्रमे पहिले सहा क्रमांक पटकाविले. पुणे महानगर विभागात मंजरी धोंडीयाल (गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल), अलिषा पाटील (बीएसएम प्रशाला), गौरी मुळीक (वाघिरे प्रशाला), गंधार गोखले (अभिनव इंग्रजी) कालीथ गुरुनानी (गोयल गंगा इंटरनॅशनल) रुद्र कोल्हे (वाघिरे प्रशाला) हे अनुक्रमे पहिल्या सहा क्रमांकाचे मानकरी ठरले
Comments are closed.