कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, कर्जमाफीवरुन शेतकरी आक्रमक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करू असे जाहीरनाम्यात सांगितले होते. तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नसल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मजले ता. हातकंणगले येथे त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते.सांगली येथील भाजप कार्यकर्ता मेळावा संपवून कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी 5 च्या सुमारास स्वा.शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सांगली-कोल्हापूर महामार्गावर मजले येथील पेट्रोल पंपाशेजारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले.राज्यात दररोज 8 हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत.विधानसभा निवडणुका संपून जवळपास 8 महिने झाले तरीही सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही स्वा.च्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. अवकाळी पाऊस , दुष्काळ , वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीने संपुर्ण कर्जमाफी करावे अन्यथा संपुर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

Comments are closed.