विमा मिळवण्यासाठी अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देऊन जाळून मारले, औसातील कार जळीत प्रकरणाचा उलगडा

औसा तालुक्यातील वानवडा रोडवर १३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता एका कारला आग लागून ती पूर्णपणे जळाली होती. कारमध्ये एक व्यक्ती जळून मृत्यूमुखी पडली होती. या प्रकरणाचा तपास करताना औसा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कामगिरी करीत गुन्हा उघडकीस आणला आहे. कर्जबाजारीपणामुळे विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आरोपीने अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देऊन तिचा खून करून कार जाळली असल्याचे समोर आले आहे.

अटकेतील आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) हा मयत बळीराम राठोड याचा मेहुणा असून तो त्याची कार (क्र. MH-43-AB-4200) वापरत होता. आर्थिक अडचणीत सापडलेला गणेश गेल्या तीन वर्षांपासून एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स धारक होता. त्याच्यावर सुमारे ५७ लाख रुपयांचे कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी व कुटुंबाला विम्याची रक्कम मिळावी यासाठी त्याने स्वतःची आत्महत्या किंवा दुसऱ्या व्यक्तीचा खून करून तो स्वतःचा असल्याचा बनाव करण्याचा विचार गेल्या एक महिन्यापासून करत होता.

१३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घरातून बाहेर पडलेल्या गणेशने याकतपूर रोड चौकात गोविंद किशन यादव (वय ५०, रा. पाटील गल्ली, औसा) यांना लिफ्ट दिली. दारूच्या नशेत असलेल्या गोविंदला ड्रायव्हर सीटवर बसवून सीट बेल्ट लावले. सीटवर माचीसच्या काड्या व प्लास्टिक पिशव्या टाकून आग लावली व पेट्रोल टाकीचे झाकण उघडे ठेवून तो पसार झाला. कार पूर्ण जळाल्यानंतर गणेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे पसार झाला होता. मात्र पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याचा पाठलाग करून अटक केली.

या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५२१/२०२५ कलम १०३(१), २३८ भा.दं.वी. अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक निरीक्षक सदानंद भुजबळ व औसा ठाण्याचे निरीक्षक रेवणनाथ डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

Comments are closed.