लातूर हादरलं! शेती विकण्यास विरोध करणाऱ्या आईचा खून करून मृतदेह शेतात पुरला, मुलानंही घेतला गळफास

मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्यास विरोध करणाऱ्या आईचा मुलाने खून केला आणि त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात समोर आली आहे. 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला असून आईचा खून करणाऱ्या मयत मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आईच्या खुनामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचा संशय मृत महिलेच्या मुलीने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील काकासाहेब वेणूनाथ जाधव (वय – 48) यांनी रेणापूर-पिंपळफाटा येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याच दरम्यान मयताच्या आईचाही मृतदेह शेतात आढळून आला. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर घटनेची माहिती मयताचा मेहुणा विनायक कोंडीराम जगदाळे (रा. ईडी. ता. रेणापूर) यानंतर दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, या प्रकरणी मयताचा मुलगा शुभम काकासाहेब जाधव यांनी पोलिसांना शुक्रवारी अशी फिर्याद दिली की, माझ्या वडिलांना माझ्या बहिणीच्या लग्नाचे कर्ज झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठी शेती विकूया असे म्हणत वडील आजी समिंद्रबाई वेणुनाथ जाधव (वय – 80) हिच्या मागे लागले होते, मात्र आजीचा याला विरोध होता. त्यामुळे वडिलांनी आजीचा काटा काढावा या उद्देशाने तिला जबर मारहाण केली आणि तोंड दाबून तिचा जीव घेतला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेतीतील ऊसाच्या फडात पुरले. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 103 (1) 238 बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला. यानंतर रेणापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आई व मुलाचे एकाच चितेवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments are closed.