50 रुपयाची उधारी मागितल्याने गमावला जीव; लातूरमधील धक्कादायक घटना, पोलीस ताफा घटनास्थळी

लातूर : किरकोळ कारणावरुन मारहाण किंवा गंभीर जखमी करण्याच्या घटना सातत्याने घडतात. मात्र, लातूरमध्ये केवळ 50 रुपयांच्या उधारीच्या मागणीवरुन चक्क एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी, विवेकानंद चौक पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करत लातूर (Latur) पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. किरकोळ उधारी मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

लातूरमधील बाभळगाव नाका परिसरातील म्हाडा कॉलनीत धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून केल्याची घटना घडलीय. या घटनेची माहिती मिळताच लातूरच्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, पानटपरीवरील 50 रुपयांची उधारी मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन या वादातूनच बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्र असलेल्या सुरा आणि कोयत्याने चौघांवर हल्ला केला. त्यातील गंभीर जखमी गणेश सूर्यवंशी याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, अन्य तिघे जखमी झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजीत सावंत यांनी दिली.

हेही वाचा

मोठी बातमी! 160 बांगलादेशींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला अपघात; आरोपींसह 31 जखमी

आणखी वाचा

Comments are closed.