मेल-एक्प्रेससाठी लोकल ट्रेनची रखडपट्टी, मध्य रेल्वेचे प्रवासी रोजच्या त्रासाला वैतागले; योग्य नियोजन करण्याची मागणी

मध्य रेल्वेवर परराज्यातून येणाऱ्या मेल-एक्प्रेस गाड्यांना मोकळी वाट करून देताना लोकल ट्रेनची रखडपट्टी केली जात आहे. दररोज ‘पीक अवर्स’ला हा सर्व गोंधळ सुरू असल्याने नियमित प्रवासी वैतागले आहेत. आमच्या संतापाचा उद्रेक होऊ देऊ नका, लोकलच्या गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मेल-एक्प्रेस गाड्यांचे ‘नॉन-पीक अवर्स’ला नियोजन करा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
मुंब्रा येथील अपघातानंतर लोकल ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला. त्या अपघाताने रेल्वे प्रशासन व राज्य सरकारचे अपयश समोर येताच दोन्ही यंत्रणांनी प्रवासी सुरक्षेच्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात लोकल ट्रेन फेऱ्यांचे अनियमित वेळापत्रक आणि गर्दीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंतच्या ‘पीक अवर्स’ला लोकल ट्रेनमधून लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. त्याचा विचार करून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याऐवजी ‘पीक अवर्स’ला परराज्यातून येणाऱ्या मेल-एक्प्रेस गाड्यांना पुढे जायला दिले जात आहे. त्या गाड्यांसाठी लोकल ट्रेन सायडिंगला टाकल्या जातात. विशेषतः उत्तर-दक्षिण हिंदुस्थानातून मुंबईला येणाऱ्या मेल-एक्प्रेस गाड्यांमुळे कसारा ते कल्याणदरम्यान लोकल ट्रेनचा खोळंबा होत आहे. त्याचा कल्याणपुढील मार्गावरील लोकल सेवेवरही परिणाम होत आहे. पावसाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन ‘पीक अवर्स’ला हा गोंधळ सुरू असल्याने नियमित प्रवासी रेल्वे प्रशासन तसेच राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
मुंब्रा येथील अपघातानंतरही रेल्वे प्रशासन व सरकारने प्रवासी सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने विचारात घेतलेला नाही. रेल्वे प्रशासन फक्त लोकांचे जीव घेण्याचे प्लॅन करतेय. माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मेल-एक्प्रेससाठी कल्याणला मोठे यार्ड उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. सत्ताधाऱ्यांच्या राजकारणात तो प्रस्ताव मागे पडला. सत्ताधाऱ्यांच्या खेळात सामान्य प्रवाशांचे जाणारे बळी थांबवा, असे महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना अध्यक्ष वंदना सोनवणे म्हणाल्या.
सकाळी गर्दीच्या वेळेत लोकलचा खोळंबा होऊ नये, गर्दीमुळे अपघात होऊ नये यासाठी सकाळी मुंबईत येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस कर्जत आणि कसारा येथे थांबवाव्यात. मेल-एक्प्रेसच्या वेळापत्रकात कायमस्वरूपी बदल करावा, त्या गाड्या मुंबईत दुपारच्या वेळेत येतील यादृष्टीने वेळेचे नियोजन करावे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य मनोहर शेलार यांनी सांगितले.
Comments are closed.