विधानपरिषदेच्या सभापतींविरोधात महाविकास आघाडी आक्रमक, राज्यपालांची भेट घेत दिलं निवेदन

विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये सभापती व अध्यक्षांकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती आणि एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियम बाह्य सभागृहाचे कामकाज चालवले जात आहेत. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना सभागृहात सभापती व अध्यक्षांकडून पक्षपाती वागणूक मिळत असून सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत निवेदन दिले आणि विरोधी पक्षास न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली.

आम्हाला सभागृहात बोलू देत नसाल तर इथे यायचे कशाला? परिषदेत ‘नियमबाह्य’ गळचेपी होत असल्याचा विरोधकांचा आरोप

याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधिमंडळ गटनेते व आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अ‍ॅड. अनिल परब, भास्कर जाधव, भाई जगताप, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत, सचिन अहिर, आनंद बाळा नर, प्रवीण स्वामी, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, अरुण शेठ, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील व वरुण सरदेसाई उपस्थित होते.

Comments are closed.