Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स संक्षिप्त स्वरुपात…
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील, गावा-खेड्यातील दिवसभरातील सर्व घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर…
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांनी गेल्या 8 दिवसांत दोनवेळा केलेल्या राजकीय वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. थेट देशाचा पंतप्रधान लवकरच बदलणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमातही त्यांनी पुनर्उल्लेख केला. देशाच्या पंतप्रधानपदी नागपुरातील भाजपच्या (BJP) नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी 19 तारीखही सांगितल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तर, भाजप नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर टीका करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेले आहे. दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत. त्यामुळे, त्यांचे वक्तव्य अनेकांना गंभीर वाटत आहे. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. मोदी तेरी कबर खुदेगी, अशी घोषणा दिल्लीत काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यानंतर, भाजपकडूनही काँग्रेसवर जोरदार पलटवार करण्यात आला. काँग्रेसची विचारसरणी आणि मानसिकतेचं प्रदर्शन यातून होत असल्याचं भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देत काँग्रेसच्या नेत्यांचं हे वर्तन ही मूर्खपणाची घोषणा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान पदाबाबत केलेल्या भविष्यवाणीवरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, त्यांना स्वप्न पडत होती हे आम्ही पाहिलेलं आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेता, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पीएमओचे मंत्री राहिले त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागला म्हणजे निश्चितच यात काहीतरी काळबेरं आहे. त्यामुळे, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच, असा विचार करुन त्यांनी स्वत:ला फार त्रास करुन घेऊ नये, असा माझा त्यांना सल्ला असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
Comments are closed.