Maharashtra Forest Minister Ganesh Naik’s information about Animal Museum
– प्रेमानंद बच्छाव
मुंबई : “गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात वन्यप्राण्यांसाठी वनतार प्राणीसंग्रहालय उभारले जावे, यासाठी उद्योगपती अनंत अंबानी यांना पत्र लिहिणार आहोत. तसेच, याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला देणार आहोत.” अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी (5 मार्च) विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. “राज्यात सन 2000 च्या सुमारास महाराष्ट्रात 101 वाघ होते. आता या वाघांची संख्या वाढून 444 इतकी झाली आहे,” असेदेखील त्यांनी सांगितले. (Maharashtra Forest Minister Ganesh Naik’s information about Animal Museum)
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत भंडारा जिल्ह्यात वाघांकडून महिलांवर झालेल्या हल्ल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाईक यांनी राज्यात वाघ आणि बिबटयांमुळे निर्माण झालेल्या मानव-प्राणी संघर्ष रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी येत्या शुक्रवारी आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
साल 2000 च्या सुमारास राज्यात 101 वाघ होते आता त्यांची संख्या 444 झाली आहे. मोठ्या प्रमाणात हि संख्या वाढत आहे. गुजरात मध्ये ज्या प्रकारे वंतारा पशु संग्रहालय आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील विविध उद्योगपतींना पशु संग्रहालय बनविण्यास परवानगी द्यावी अश्या मागणीचा प्रस्ताव… pic.twitter.com/2sGPfmz4ZI
— Ganesh Naik (@NaikSpeaks) March 5, 2025
भंडाराजवळच्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनलगत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली. भंडारा वनविभागातील अडयाळ, लाखांदूर येथील मानवी वस्तीनजीक बीटी-10 या वाघिणीच्या 2 वर्षांच्या बछडयाने हा हल्ला केला आहे. त्याला जेरबंद करून भंडारा वनक्षेत्रातील कोका नियत क्षेत्रात सोडण्यात आल्याचे गणेश नाईक म्हणाले. राज्यात एकूण 61991.89 चौ.कि.मी. वनक्षेत्र असून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एकूण 11 प्रादेशिक वनवृत्त आणि 2 वन्यजीव वनवृत्त आहेत. तसेच वन्यजीव संरक्षणासाठी राज्यात 6 राष्ट्रीय उद्याने, 52 वन्यजीव अभयारण्ये आणि 28 संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यापैकी 5 राष्ट्रीय उद्याने आणि 15 वन्यजीव अभयारण्यांचा समावेश करुन 6 व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती नाईक यांनी यावेळी दिली.
Comments are closed.