Maharashtra Rain Heavy rain across state including Mumbai, Meteorological Department issues alert for Konkan


गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यभरात जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, पालघर, विरार आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात रविवारपासूनच (ता. 15 जून) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यभरात जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, पालघर, विरार आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात रविवारपासूनच (ता. 15 जून) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी (ता. 16 जून) मध्यरात्रीपासून राज्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू असून मुंबईत सततच्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर कोकणातील अनेक जिल्ह्यामध्ये आज सोमवारी अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबईला यलो अलर्ट दिला असून कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rain Heavy rain across state including Mumbai, Meteorological Department issues alert for Konkan)

मुंबईत सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाने काही मिनिटांसाठी सुद्धा विश्रांती न घेतल्यामुळे याचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलसेवेवर सततच्या पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर सतत पडणाऱ्या पावसामुळे परिणाम झाला असून या दोन्ही मार्गावरील वाहतूक ही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे. तसेच, ईस्टर्न हायवे आणि वेस्टर्न हायवेसह सर्व वाहतूक संथ गतीने सुरू आहेत. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जलमय रस्त्यांमुळे चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. पण मुंबईत दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा… Badalapur : पूर नियंत्रण रेषेसह विविध प्रकल्प मार्गी लागणार

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मुंबईत दिवसभर पाऊस सुरू राहणार आहे. तर, कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कोणत्याही प्रकारचा अलर्ट दिलेला नसला तर या भागात पावसाचा जोर दिसून येईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुणे, सातारा व कोल्हापूरमधील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागपूर, विदर्भ परिसरात आज मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोमवार ते गुरुवार या चार दिवसांदरम्यान विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.





Source link

Comments are closed.