Dcm ajit pawar, eknath shinde pays tribute to padmashri awardee maruti chitampalli in marathi


Ajit Pawar : पुणे : सोलापूरचे सुपूत्र, सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने ते आजारीच होते. हा पुरस्कार घेऊन दिल्लीहून परतल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर, बुधवार, 18 जून रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठीतील थोर साहित्यिक आणि पक्षीतज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांनी मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. (dcm ajit pawar, eknath shinde pays tribute to padmashri awardee maruti chitampalli)

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अजित पवार म्हणतात, ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनानं साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनानं निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.

हेही वाचा – Maruti Chitampalli Passes Away : पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन, 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मारुती चितमपल्ली सरांनी आपलं संपूर्ण आयुष्य वन, प्राणी, पक्षी आणि निसर्गाच्या गूढ अभ्यासासाठी समर्पित केलं. वृक्ष, पाने, फुलं, पक्षी, प्राणी, डोंगर अशा निसर्गातील अनेक गोष्टींची माहिती असलेला विश्वकोश ही त्यांची ओळख असल्याचेही अजित पवार म्हणतात. त्यांच्या लेखनातून मराठी साहित्यात निसर्गाविषयी संवेदनशील जाण निर्माण झाली. त्यांच्या लेखणीतून मराठी शब्दसंपदेत अनेक नवे शब्द, संकल्पना आणि अनुभवांची भर पडली.

30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. हा गौरव त्यांच्या संपूर्ण कार्याचा योग्य सन्मान होता. मात्र त्यानंतर अल्पावधीतच त्यांचं निधन झालं, हे अधिकच वेदनादायी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

निसर्गाचा वाटाड्या गेला – एकनाथ शिंदे

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने एका मनस्वी आणि स्वच्छंदी अरण्यऋषीला आपण मुकलो आहोत. निसर्गाची ओळख करून देणारा आपला वाटाड्या गेला, अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वसामान्यांना जंगल आणि एकूणच निसर्गाविषयी गोडी लावण्याचे मोठं काम त्यांनी केलं. अरण्य सुद्धा कसं बघायचं, वाचायचं हे त्यांनी शिकवलं.

वन खात्यात काम करतांना सुद्धा ते केवळ एक शासकीय अधिकारी म्हणून राहिले नाहीत तर त्यांच्यातला चोखंदळ संशोधक त्यांनी जिवंत ठेवला. त्यांनी केवळ महाराष्ट्र हेच आपलं कार्यक्षेत्र मानलं नाही तर देशभर भटकंती केली. तेरा भाषांचे ज्ञान असलेले मारुती चितमपल्ली हे आदिवासींशी सुद्धा त्यांच्या भाषेत संवाद साधत. निसर्ग साहित्यात मोठं योगदान केलेल्या आरोपीची संपली यांनी आपल्या आजूबाजूचे पशु पक्षी आणि निसर्ग यावर प्रेम करायला शिकवलं. त्यांचा हा विचार आत्ताच्या पिढीने पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.





Source link

Comments are closed.