In four days Mumbra railway station accident cargo ship accident Rajasthan road accident and today Air India passenger plane accident
सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस जोपर्यंत घरी परत येत नाही, तोपर्यंत मनात चिंता असते. कारण सध्याच्या काळात अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसात रेल्वे अपघात, जल अपघात, रस्ते आणि आज विमान अपघातात झाला आहे. त्यामुळे प्रवास नेमका कोणता सुरक्षित? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई : सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस जोपर्यंत घरी परत येत नाही, तोपर्यंत मनात चिंता असते. कारण सध्याच्या काळात अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वीच म्हणजे 9 जून रोजी मुंबईतील मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वे अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर त्याच दिवशी अरबी समुद्रातील बेपोर-अझिक्कल बंदराच्या पश्चिमेला सुमारे 40 किमी अंतरावर एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागली होती. त्यानंतर 11 जून रोजी राजस्थानमध्ये 3 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता. अशातच आज (12 जून) गुजरातमधील अहमदाबादमध्ये प्रवासी विमान अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवास नेमका कोणता सुरक्षित? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (In four days Mumbra railway station accident cargo ship accident Rajasthan road accident and today Air India passenger plane accident)
मुंब्रा रेल्वे अपघात
मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या पुढे सीएसएमटीच्या दिशेने जाताना येणाऱ्या वळणावर 9 जून रोजी मोठा अपघात झाला होता. मुंब्रा स्थानकाच्या पुढे येणाऱ्या वळणावर दोन्ही लोकल बाजूला आल्याने फूटब्रीजवरून प्रवास करणारे प्रवासी एकमेकांवर आदळले आणि लोकलच्या खाली पडले होते. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 जण जखमी झाले होते. याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.
मालवाहू जहाजाला भीषण आग
अरबी समुद्रात Wan Hai 503 हे मालवाहू जहाज जे मुळचे सिंगापूरचे होते आणि ते 9 जून रोजी कोलंबोहून न्हावा शेवा येथे जात होते. पण न्हावा शेवा या बंदरावर पोहोचण्याआधीच या जहाजामधील अंडरडेकमध्ये आग लागली होती. त्यानंतर या जहाजामध्ये स्फोट झाला आणि ही आग वाढत गेली होती. जहाजावर एकूण 22 क्रू मेंबर्स होते. त्यातील काहींनी आपला जीव वाचविण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या, तर पाच क्रू मेंबर्स जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने कोचीहून तीन इंटरसेप्टर बोटी आणि बेपोरहून आणखी पथके तैनात केली होती. तसेच नौदलाने घटनास्थळी डॉर्नियर हेलिकॉप्टरही तैनात केले होते.
हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये प्रवासी विमान रहिवासी भागात कोसळले, 242 प्रवासी दगावल्याची भीती
राजस्थान रस्ते अपघात
राजस्थानमध्ये 11 जून रोजी 3 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाले होते. बुधवारी सकाळी जयपूरजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात नवविवाहित वधूसह पाच जणांचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाले होते. तर दुसऱ्या अपघातात लग्नानंतर परतणाऱ्या वरासह तीन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले होते. तसेच मंगळवारी (10 जून) रात्री उशिरा जालोर जिल्ह्यातील चार्ली गावाजवळील राज्य महामार्गावर एका बैलाला धडकल्यानंतर दोन प्रवासी वाहने एकमेकांवर आदळून तिसरा अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा मृत्यू आणि 13 जण जखमी झाले होते.
अहमदाबादमध्ये आज रहिवासी भागात प्रवासी विमान कोसळले
अहमदाबादमधील ल्लभभाई पटेल विमानतळाजवळील मेघानी परिसरात एअर इंडियाच्या बोइंग 787 या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. या विमानातून एकूण 242 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी विमानाने उड्डाण केलं आणि अवघ्या पाच मिनिटात विमान कोसळलं. यानंतर प्रशासनाने जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर त्वरित उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताबद्दल DGCA ने दिली ही माहिती
Comments are closed.