NCP SP leader Rohit Pawar expressed grief over the Indrayani bridge accident in marathi
ही दुर्घटना का घडली याचीही सखोल चौकशी करण्याची आणि आता पावसाळा असल्याने अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याचीही काळजी प्रशासनाने घ्यायला हवी, अशा शब्दात रोहित पवार यांनी प्रशासनाचे कान देखील टोचले आहेत.
Rohit Pawar : मुंबई : रविवारी पहाटे केदारनाथ येथे खराब हवामानामुळे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील तिघांनी जीव गमावला. त्या दुःखातून बाहेर येत नाही तोच दुपारी पुन्हा एक अपघात घडला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा या ठिकाणी असलेल्या पुलावर अनेक पर्यटक उभे असताना हा पूल तुटला आणि यामध्ये 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या अपघातावरून आता राजकीय नेते देखील आपल्या भावना व्यक्त करत आहेत. (NCP SP leader Rohit Pawar expressed grief over the Indrayani bridge accident)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये पवार यांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. मावळमध्ये (पुणे) कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं तर 20 ते 25 जण वाहून गेल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असल्याचे सांगतानाच त्यांनी गुजरात येथील विमान अपघाताची देखील आठवण काढली आहे. गुजरातमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात 270 जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेतून आपण सावरत नाही तोच मन सुन्न करणारी ही दुसरी दुर्घटना घडली. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असावेत आणि सुखरुप परतावेत, यासाठी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना देखील केली आहे.
हेही वाचा – Sushma Andhare : पूल दुर्घटनेतील बळी स्थानिक लोकप्रतिनिधींनीमुळेच; सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप
मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ही दुर्घटना का घडली याचीही सखोल चौकशी करण्याची आणि आता पावसाळा असल्याने अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याचीही काळजी प्रशासनाने घ्यायला हवी, अशा शब्दात त्यांनी प्रशासनाचे कान देखील टोचले आहेत.
मावळमध्ये (पुणे) कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून सहाहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं तर २० ते २५ जण वाहून गेल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. गुजरातमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात २७० जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेतून आपण सावरत नाही तोच मन सुन्न…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 15, 2025
कुंडमळा हे इंद्रायणी नदीवरील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी दर रविवारी तसेच सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हा पूल काही दिवसांपासून सुस्थितीत नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. हा पूल कमकुवत झाल्याची तक्रारही येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आणि या पुलावर पर्यटकांची गर्दी वाढल्याने हा पूल आज रविवार (ता. 15 जून) दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास कोसळला. आणि यावेळी पुलावर असलेले 20 ते 25 जण पाण्यात बुडाले. दोन ते तीन दिवसांपासून मावळ तालुक्यात आणि इंद्रायणी नदीपात्र परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीतील पाण्यात वाढ झाली आहे.
Comments are closed.