Raj Thackeray wrote a letter to schools after the GR issued regarding Hindi language
मुंबई : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात त्रिभाषी सूत्र अनिवार्य करण्यात आले. त्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली. पण त्याला कडाडून विरोध झाल्यावर सरकारने एक पाऊल मागे घेतले. आता नवा जीआर जारी करून मराठी आणि इंग्रजी सक्तीची तर, तिसरी भाषा पर्यायी ठेवली आहे. पण मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी अप्रत्यक्षपणे ही हिंदीचीच सक्ती आहे. त्यावरून सर्व पक्ष आक्रमक झाले आहेत. तर हा जीआर निघाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व शाळांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या छुप्या हेतूंना जर का शाळा मदत करणार असतील तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू, असे या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सांगितले आहे. (Raj Thackeray wrote a letter to schools after the GR issued regarding Hindi language)
हेही वाचा… Raj Thackeray : शाळेत हिंदी कशी शिकवतात, हे बघतोच…; राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा
महाराष्ट्रात शिक्षण घेताना हिंदी भाषा अनिवार्य नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पण या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील शाळांना जे पत्र पाठविण्यात येणार आहे, त्याचेही वाचन करून दाखवले. हे पत्र आता X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आले आहे. त्यांनी या पत्रात सुरुवातीला लिहिले आहे की, “महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र, एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय आला. ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, पुढे त्यावर जनमत तयार झाले. पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितले की हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल.”
तसेच, “हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे, म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आपल्याला काय देणंघेणं त्याच्याशी. पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती आली तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहणार.” असे राज ठाकरेंनी पत्राच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले आहे.
तर, “पुढे सरकारने सांगितले की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. बरं याचा लेखी आदेश अजून आला आहे का? तसा तो कुठे आला असेल तरी आम्हाला तो दिसला नाही. कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेले सरकार हा कागद पण नाचवून दाखवेल. मग आमचा प्रश्न आहे की, तिसरी भाषाच मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आले आहे की पुस्तक छपाई सुरू आहे. याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असे दिसतंय. याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका,” असे आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आले आहे.
“मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचे नुकसान आहेच पण मराठी भाषेचे नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचे तसेच महाराष्ट्राचे नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झाले. अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेले राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका.” अशी विनंती राज ठाकरेंनी या पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शाळांना केली आहे.
“उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात. पण आतापासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचे ओझे लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला) येतील.” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
“या विषयांत जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय, तसेच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवले आहे. हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचं लेखी पत्र हवे, असे आम्ही सरकारला ठासून सांगितले आहे. ते पत्र काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की… महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे ! बाकी आपण सुज्ञ आहातच ! अधिक काय लिहीणे !” असे या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
Comments are closed.