Sanjay Raut criticism while reacting to Ajit Pawar becoming the Chief Minister
भाजपासोबत असेपर्यंत अजित पवार कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना त्यांचा गट भाजपमध्ये विलीन करावा लागेल, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडा, रिकामी करा, असे आदेश दिले आहेत. त्यांनी दिलेल्या या आदेशामुळे काँग्रेसची नेतेमंडळी संतापली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा बावनकुळेंच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. पण राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. भाजपासोबत असेपर्यंत अजित पवार कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना त्यांचा गट भाजपमध्ये विलीन करावा लागेल, असा टोला राऊतांनी लगावला आहे. (Sanjay Raut criticism while reacting to Ajit Pawar becoming the Chief Minister)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 5 मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांकडे लोक गांभीर्याने बघत नाही. शिवसेना फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, काँग्रेस फोडा, आता ते एकनाथ शिंदे यांची शिंदे गटही फोडणार आहेत. तसेच ते अजित पवार यांचा गटही फोडणार आहेत. मुघलांना स्वप्नात संताजी, धनाची दिसायचे, तसे यांना आता स्वप्नात फक्त फोडाफोडी दिसते, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : त्यांना थोडी जरी लाज असती तर…, बावनकुळेंच्या विधानावर राऊतांची सडकून टीका
तर, अजित पवार यांना शरद पवार राजकीयदृष्ट्या माफ करणार नाहीत. अमित शहा यांनी ज्यापद्धतीने अजित पवार यांना हाताशी धरून पक्ष फोडला, ही काय महान विचारधारा वैगरे नाही. ते घाबरून पळून गेलेले लोकं आहेत. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजपसोबत असताना ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना त्यांचा गट भाजपमध्ये विलीन करावा लागेल. त्यानंतर त्यांना भविष्यात भाजपचे म्हणून ही संधी मिळून शकते, असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी व्यक्त केले आहेत.
शरद पवारांना भेटलो, पण…
खासदार संजय राऊत यांना यावेळी त्यांनी शरद पवारांच्या घेतलेली भेट याबाबतही विचारणा करण्यात आली. या भेटीबाबत खासदार राऊत म्हणाले की, शरद पवार यांची रविवारी आपण भेट घेतली. “नरकातल स्वर्ग” या आपल्या पुस्तकाचे 17 मे रोजी प्रकाशन होणार आहे. त्या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे आहेत. त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती, ती आपण दिली आणि त्यावर चर्चा झाली. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि कश्मीरमधील नरसंहार याला केंद्रीय गृहमंत्री अमिl शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहोत. संकटकाळात सरकारला पाठिंबा देणे म्हणजे नरसंहाराला जबाबदार असलेल्यांना पाठिंबा देणे असे होत नाही, हे आपले मत असून ते स्पष्टपणे त्यांना सांगितले आहे. संकटकाळात सरकारसोबत राहिले पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. मात्र, हे सरकार पाठिंबा देण्याच्या लायकीचे नाही. हे बदमाशांचे सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटाही दिसत नाही. अशा लोकांना पाठिंबा देणं म्हणजे देशाशी बेइमानी करण्यासारखे आहे, असे पुन्हा राऊतांकडून सांगण्यात आले.
Comments are closed.