Sanjay Raut makes serious allegations against former minister Ravindra Chavan over Indrayani river bridge Collapsed
मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा या पर्यटन स्थळावर रविवारी (ता. 15 जून) दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. कुंडमळा येथे असलेल्या पुलावर लोकांची गर्दी जास्त झाल्याने हा पूल कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण अद्यापही काही पर्यटक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलेला असतानाच आता या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. 2024 मध्ये या पुलासाठी मंजूर झालेले पैसे गेले कुठे? असा सवाल उपस्थित करत राऊतांनी त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Sanjay Raut makes serious allegations against former minister Ravindra Chavan over Indrayani river bridge Collapsed)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 16 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पनवती असे म्हटले आहे. तसेच, कुंडमळा दुर्घटनेवरून सरकारवर आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप करताना राऊतांनी म्हटले की, काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? अजित पवारांनी हे सांगितले पाहिजे. याबाबतीत सरकार किती गंभीर आहे? या पुलाच्या बांधकामाचे पैसे हे कागदावर मंजूर झाले आहेत. त्या पुलाच्या निर्मीतीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत. पण ते कागजावर मंजूर झाले आहेत, मग पूल का नाही झाला? असा सवाल यावेळी राऊतांकडून उपस्थित करण्यात आाल आहे. या पुलाच्या बांधकामासाठी मंजूर झालेले पैसे गेले कुठे? बाकी सर्व गोष्टींना पैसे मिळत आहेत. मते विकत घेण्यासाठी, आमदार-खासदार विकत घेण्यासाठी, निवडणुकीत पैसे मिळतात, लाडक्या बहिणींची मते विकत घेण्यासाठी पैसे मिळतात. पण काल एका पुलामुळे ज्या लोकांचे बळी गेले, तो पूल दुरुस्त करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, असे राऊतांनी म्हटले आहे.
हेही वाचा… Raj Thackeray : सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर…, इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर राज ठाकरे संतापले
माझ्यासमोर एक पत्र आहे, असे सांगत खासदार राऊतांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 11 जुलै 2024 रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांनी कुंडमळा रस्त्याचे काम आणि इंद्रायणी नदीवर पुलाला मंजुरी दिली. हे त्यांनी कोणाला कळवले? रविंद्र भेगडे, अध्यक्ष, भाजपा मावळ तालुका यांना कळवले. त्यांच्या सहीचे हे पत्र आहे. त्यामुळे मंत्री सही करताना सुद्धा झोपून असतात ते बघा. 8 कोटींचे हे काम आहे, पण पत्रात उल्लेख आहे 80 हजार रुपयांचा. त्यावर मंत्र्यांची सही आहे. आपण कोणत्या कागदावर सही करत आहोत. त्यामुळे किती गांभीर्य आहे बघा. माझा चष्म्याचा नंबर बदलेला नाही ना म्हणून मी आकडा अनेकांना दाखवला, असे म्हणत राऊतांनी प्रसार माध्यमांसमोरच या पुलाच्या बांधकामासंदर्भातील पत्र दाखवले.
इंद्रायणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी एक मंत्री एका पुलावर सही करत आहे. एक पूल बांधण्यासाठी किमान 10 ते 15 कोटी रुपयांची गरज असते. पण कोणाला तरी खूश करायचे आहे, कोणाला तरी पत्र द्यायचे आहे, म्हणून पीएने पत्र टाइप केले आणि त्यांचे काम मंजूर केले. यात 80 हजारांचा उल्लेख आहे. हे पत्र मंत्री रवींद्र चव्हाण देतात आणि मावळचे कोणी प्रांताध्यक्ष आहेत, ते हसत हसत हे पत्र घेऊन जाऊन दाखवतात. काल तो पूल कोसळून लोक वाहून गेले, मृत्यू झाले. हे सगळं या भाजपा पुढाऱ्यांचे जनतेच्या प्रति प्रेम आहे. अजित पवार काही बोलल्याचे मी पाहिले नाही. पालकमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? असाही सवाल संजय राऊत यांनी केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत पण तुमची चौकशी केली पाहिजे, कारण तुम्ही आल्यापासून दुर्घटनांची मालिका राज्यात सुरू आहे. रविवारचे बळी हे भ्रष्टाचार आणि बेफिकिरीचे बळी आहेत असाही, आरोप संजय राऊत यांनी केला.
इंद्रायणी नदीत पूल कोसळून किमान ४० जण वाहून गेले.
या पुलासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते म्हणतात;
संबधित मंत्र्याचे पत्र पहा,
एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मुर्ख बनवले जात आहे
फडणवीसांचे राज्य आहे,चालायचेच!
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks pic.twitter.com/Blbupinujf— Sanjay Raut (@rautsanjay61) June 16, 2025
Comments are closed.