Sanjay Raut Shivsena UBT on Shaktipith Project and Maharashtra Corruption


मुंबई : राज्य सरकारच्या पहिल्या ई-कॅबिनेटमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी 20 हजार 787 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही सरकारने हे पाऊल उचलल्याने आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात सध्या जेवढे भ्रष्टाचार आणि घोटाळे सुरु आहेत, त्याची तुलना जगात कोणत्याही घोटाळ्याबरोबर होणार नाही.” असे म्हणत त्यांनी समृद्धी महामार्गाचे उदाहरण देत भाजप महायुती सरकावर टीका केली आहे. (Sanjay Raut Shivsena UBT on Shaktipith Project and Maharashtra Corruption)

हेही वाचा : Emergency 1975 : सध्या देशात आणीबाणीचा बाप आहे, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर घणाघात 

शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “19 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन झाले. इगतपुरी ते आमणे या महामार्गाचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत झाले. हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत. या सर्व ड्रीम प्रोजेक्टमध्ये 50 टक्के घोटाळा आहे. या सर्व ड्रीम प्रोजेक्टमधील अर्धा पैसा हा निवडणुकीमध्ये मते विकत घेण्यासाठी तसेच आमदार, खासदार विकत घेण्यासाठी वापरला जातो. शिवसेना उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची लोकं विकत घेण्यासाठी हा सर्व पैसा ठेकेदारांकडून बाहेर आला.” असा मोठा दावा यावेळी त्यांनी केला आहे.

“शक्तीपिठासाठी 20 हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातले किमान 10 हजार कोटी बाहेर येतील, जसे एमएमआरडीएचे 3 हजार कोटी बाहेर आले. मला खात्री आहे, हेच 10 हजार कोटी रुपये हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठेकेदारांकडून वापरले जातील हे मी आताच सांगतो. हे सगळे जे ड्रीम प्रोजेक्ट सुरु आहेत, हे सगळे ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यसाठी सुरु आहेत. महाराष्ट्राला यातून किती फायदा आहे? हा पुढचा प्रश्न आहे. सगळ्यात आधी आपले खिसे भरा, यासाठी हा प्रोजेक्ट आहेत.” असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदारांना दोषी धरून चालणार नाही. त्यासंबंधित खात्यातील मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.



Source link

Comments are closed.