ममता बॅनर्जींचा लोकशाहीला धोका

पंतप्रधान मोदी यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत, ही टिप्पणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. ही टिप्पणी त्यांनी म्ंगळवारी विधानभा निवडणूक प्रचाराच्या संबंधात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली होती. या टिप्पणीवर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. आता या पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे खर्गे यांच्यावर कठोर करावाई करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आयोगाने कारवाईचे आश्वासन दिले आहे.

निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेची माहिती नंतर निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांना दिली. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच ते राज्यसभेत विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यांच्या दर्जाच्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख स्पष्टपणे ‘दहशतवादी’ असा करणे, हे धक्कादायक आहे. भारताची प्रतिष्ठा खर्गे यांनी मलीन केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमच्या निवेदनात केल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

खर्गे यांच्याकडून सारवासारवी

बुधवारी तामिळनाडूत एका पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त विधान केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी सारवासारवी करण्याचा प्रयत्नही केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तीश: दहशतवादी आहेत, असे माझे म्हणणे नव्हते. ते सीबीआय, प्राप्तीकर विभाग, एनआयए, ईडी अशा केंद्रीय संस्थांचा उपयोग विरोधी पक्षांना घाबरविण्यासाठी आणि त्यांच्या मनात भयगंड निर्माण करण्यासाठी करतात. ही त्यांची कृती दहशतवादी आहे, असे आपल्याला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तथापि, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी म्हणून केलेल्या उल्लेख अगदी स्वच्छ आहे. त्यांच्या या विधानातून काँग्रेसची संस्कृती काय प्रकारची आहे, हे दिसून येते, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. विरोधी पक्षनेत्यांना नैराश्याने घेरले असून त्यामुळे ते अशी बेताल भाषा करीत आहेत, असे प्रतिपादन या पक्षाच्या अनेक नेत्यांनी केले आहे.

Comments are closed.