तुफान फॉर्ममध्ये, पण दरवाजे बंदच! निवडकर्त्यांचा हट्ट की काही वेगळं?, मोहम्मद शमी काय म्हणाला?


रणजी ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमी: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) रणजी ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी करत आहे. शमीने अवघ्या 28 षटकांत 8 विकेट्स घेतले. याआधीच्या सामन्यातही त्याने उत्तराखंडविरुद्ध 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे शमी सातत्याने बंगालकडून दमदार कामगिरी करत असून, त्याच्या भेदक गोलंदाजीने तो निवड समितीला एक स्पष्ट संदेश देत आहे, की तो पूर्णपणे फिट आहे आणि टीम इंडियात पुनरागमनासाठी तयार आहे. सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, तेथे 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मात्र, शमी या संघात नाही.

मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी अन् धमाकेदार कामगिरी (Mohammed Shami Ranji Trophy 8 Wickets)

बंगाल आणि गुजरात यांच्यातील रणजी ट्रॉफीच्या गट फेरीतील सामन्यात शमीने 8 विकेट्स घेतले. पहिल्या डावात त्याने 18.3 षटकांत 44 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही गुजरातचे फलंदाज शमीसमोर टिकू शकले नाहीत. त्याने दुसऱ्या डावात आणखी 5 खेळाडूंना माघारी पाठवत पाच विकेट्स घेतले. शमीच्या या तुफानी गोलंदाजीमुळे बंगालने हा सामना 141 धावांनी जिंकला.

‘मी काही बोललो तर राडा होईल…’

यावेळी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर बंगाल विरुद्ध गुजरात रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान आर.पी. सिंगशी बोलताना मोहम्मद शमीने कोणतेही वादग्रस्त विधान करण्याचे टाळले. हलक्याफुलक्या अंदाजात तो म्हणाला, “मी नेहमीच वादांमध्ये असतो. तुम्ही (माध्यमांनी) मला तसा गोलंदाज बनवून टाकलात. मी काही बोललो तर राडा होईल. आता काय बोलू, सोशल मीडियावर तर कोणीही काहीही बोलतं.” लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. शमीच्या अलीकडच्या चमकदार फॉर्मकडे पाहता, त्याची संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.

शमी अन् निवडकर्त्यांमधील तणाव

मोहम्मद शमी शेवटचा भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेर आहे. मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांनी एका पत्रकार परिषदेत शमीच्या फिटनेसबद्दल विचारले असता “नो अपडेट” असे उत्तर दिले होते. त्यावर शमीने माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले की, “मी खेळण्यासाठी तयार आहे. जर मी फिट नसतो, तर रणजी ट्रॉफीमध्ये कसा खेळलो असतो?” आगरकर यांच्यापर्यंत शमीचे हे वक्तव्य पोहोचल्यावर त्यांनी सांगितले, “मला वाटतं शमी आणि मी याबद्दल बसून बोलण्याची गरज आहे.” एकूणच, रणजी ट्रॉफीतील शमीच्या सातत्यपूर्ण कामगिरीने तो पुन्हा टीम इंडियात येऊ शकतो.

हे ही वाचा –

Mohammad Rizwan PCB Central Contract : पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ! खेळाडूची थेट PCB विरुद्ध बंडखोरी, केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास नकार, नेमकं कारण काय?

आणखी वाचा

Comments are closed.