पावसाचा मुक्काम वाढला… आता 5 नोव्हेंबर पर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या आसपास रेंगाळलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम वाढला असून हवामान खात्याने 5 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगाल उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा याच्या एकत्रित परिणामामुळे 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ‘मोंथा’च्या प्रभावामुळे 27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र–गुजरात किनाऱ्याच्या आसपास स्थिरावलेला राहणार असून 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात याचा अधिक प्रभाव राहील.

Comments are closed.