Mumbai News – मुंबईकरांना दिलासा! पाणीपुरवठ्यात कपात नाही, धरणांत पुरेसा पाणीसाठा

वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्‍ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून (Contingency Reserve) पाणी उपलब्‍ध करून दिले आहे. सद्यस्थितीचा विचार करता मुंबईकरांच्‍या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाही. दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केले आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

तसेच, हवामान खात्‍याशी समन्‍वय साधून पावसासंबंधी अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही महापालिकेने नमूद केले. महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्‍मुंबई महापालिका मुख्‍यालयात सोमवारी उच्‍चस्‍तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, जल अभियंता, पुरूषोत्‍तम माळवदे यांच्‍यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण 22.66 टक्‍के पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय महाराष्‍ट्र शासनानेदेखील बृहन्‍मुंबई महापालिकेस भातसा धरण आणि अप्पर वैतरणा धरणातून निभावणी साठ्यातून (Contingency Reserve) अतिरिक्त पाणीपुरवठा करण्‍याचे यापूर्वीच मान्‍य केले आहे. मुंबईसाठी 31 जुलै 2025 पर्यंतच्‍या पाणीसाठ्याचे नियोजन करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सद्यस्थितीत पाणीकपातीची कोणतीही आवश्‍यकता नाही.

दरम्यान, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Comments are closed.