Mumbai Pune Expressway Over 6 Lakh Vehicles Fined Wrongly RTI reveals
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त मानला जाणारा म्हणून मुंबई पुणे महामार्गाकडे पाहिले जाते. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा महामार्ग अनेक गोष्टींमुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. मुंबई पुणे महामार्गावर अनेक अपघात झाले असून त्यावर आवर घालण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच आयटीएमएस (ITMS). अपघात टाळण्यासाठी उभारलेल्या या यंत्रणेमुळे वाहनांच्या गतीवर लगाम बसेल, अशी अपेक्षा करण्यात आली होती. यामुळे काही प्रमाणात आळादेखील बसला. पण, या नवीन यंत्रणेचा सामान्य वाहनधारकांना फटका बसल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आयटीएमएस अंतर्गत मुंबई-पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत 100 पैकी 34 चलान चुकीचे असल्याचे समोर आले आहे. (Mumbai Pune Expressway Over 6 Lakh Vehicles Fined Wrongly RTI reveals)
हेही वाचा : Uddhav Thackray on Raj Thackeray : जनतेच्या जे मनात तेच होणार, त्या युतीवर उद्धव ठाकरे म्हणाले…
माहिती अधिकारामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत 18 लाख 25 हजार ई-चलान जारी करण्यात आले. त्यापैकी 6 लाख 24 हजार चलान चुकीचे असल्याचे के. व्ही. शेट्टी यांना माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशीलामध्ये उघडकीस आले आहे. उर्वरित 124 कोटी 24 लाख रुपयांचे 12 लाख चलान होते. त्यापैकी जानेवारी 2025 पर्यंत फक्त 12 टक्के चलानचा दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे आयटीएमएसच्या कार्यक्षमतेवर वाहनचालक तसेच वाहतूकदार शंका उपस्थित करत आहेत. अनेकदा मुंबई पुणे महामार्गावर चुकीच्या पद्धीतने चलान कापले जात असल्याची तक्रार वारंवार समोर आली आहे. त्यामुळे या तपशिलामुळे आयटीएमएस प्रणालीतील त्रुटी समोर आल्या आहेत.
साधारण जुलै 2024 पासून मुंबई-पुणे महामार्गावर आयटीएमएस प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे आरटीओ आणि महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने सार्वजनिक तसेच खासगी भागीदारीतून हा प्रकल्प राबवला जात आहे. 100 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या या प्रकल्पासाठी परिवहन विभागाने 45 कोटी दिले आहेत. एमएसआरटीसीने आयटीएमएसचा भाग म्हणून 40 गॅन्ट्री आणि शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे या महामार्गावर बसवले आहेत. RTIच्या माहितीवरून असे आढळून आले की, प्रत्येक 100 चलनांपैकी जवळजवळ 34 चलान चुकीचे होते. ITMS मानवी हस्तक्षेपाशिवाय CCTV कॅमेरे आणि AI-समर्थित प्रणाली वापरून अंमलबजावणी स्वयंचलित करण्यासाठी डिझाइन केलेले असले तरी, हे ऑटोमेशन चुकीचे फायरिंग करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालक यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Comments are closed.