अर्धवट कामांमुळे मुंबईकरांना खड्ड्यांचा ताप, पावसाळ्यात खड्ड्यांच्या मनस्तापाला जबाबदार कोण?

मुंबईत पाऊस स्थिरावल्याने रस्त्यांवरील खड्डय़ांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. यातच पालिकेने नियोजित केलेल्या काँक्रिटीकरणातील 2121 रस्त्यांपैकी 1385 रस्त्यांची फक्त 342 किमीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे एकूण कामांपैकी 49.07 टक्केच कामे पूर्ण झाल्याने मुंबईकरांचा या वर्षीचा पावसाळाही खड्डय़ात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईमध्ये पावसाळय़ात रस्त्यांवर पडणाऱया खड्डय़ांमुळे वाहनचालक-नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो, तर पालिकेलाही मोठय़ा टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिकेने आपल्या अखत्यारीत असणारे सर्व 2121 किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. दोन टप्प्यांमध्ये या रस्तेकामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 31 मेपर्यंत 342.74 किमीची कामे पूर्ण झाली आहेत. एकूण 186 किलोमीटर लांबीचे 771 रस्ते एका टोकापासून दुसऱया टोकापर्यंत पूर्ण झाले आहेत. तर 156.74 किलोमीटर लांबीच्या 614 रस्त्यांचे काम चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत पूर्ण झाले आहे.

असे झाले टप्पा-1चे काम

टप्पा 1मध्ये 320.08 किलोमीटर लांबीच्या 700 रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम हाती घेण्यात आले. यापैकी 101.67 किलोमीटर लांबीचे 343 रस्त्यांचे एका टोकापासून दुसऱया टोकापर्यंत काम पूर्ण झाले आहे. तर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत 239 काम मिळून 101.68 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 700 पैकी 582 रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून त्यांची एकूण लांबी मिळून 203.36 किलोमीटर आहे. म्हणजेच निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी 63.53 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

असे झाले टप्पा-2चे काम

टप्पा-2 अंतर्गत 378.36 किमी लांबीच्या 1421 रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी 803 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये 84.33 किलोमीटर लांबीच्या 428 रस्त्यांचे काम एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण झाले आहे, तर 55.06 किमी लांबीच्या एकूण 375 रस्त्यांचे काम चौक ते चौक पूर्ण झाले आहे. म्हणजेच 31 मेपर्यंत 139.38 किमी लांबीच्या 803 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये उद्दिष्टापैकी केवळ 36.84 टक्केच काम पूर्ण झाले आहे.

रस्त्यांच्या कामावर मुंबई आयआयटीची नजर

  • रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी या कामांवर नजर ठेवण्यासाठी आयआयटी मुंबईची थर्ड पार्टी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  • यासाठी आयआयटी आणि पालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार काँक्रीट मिश्रण बनवण्यापासून ते रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत विविध चाचण्या आयआयटी, मुंबईकडून केल्या जाणार आहेत.
  • याशिवाय रस्तेकामाच्या ठिकाणी सरप्राइज व्हिजिटच्या माध्यमातून कामाचा दर्जा तपासला जाईल. एकदा काँक्रिटीकरण झाल्यानंतर कोणत्याही संस्थेला रस्ता खोदण्यास परवानगी दिली जाणार नाही.

Comments are closed.