महाराष्ट्र मणिपूरच्या वाटेवर; नागपुरात संचारबंदी, तणाव आणि भीती

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये सोमवारी रात्री दोन गटांमध्ये उसळलेल्या दंग्यानंतर आज दुसऱ्या दिवशीदेखील नागपूर धुमसत आहे. नागपूरमध्ये प्रत्येक टप्प्यावर पोलिसांचा कडक पहारा असून पुन्हा हिंसाचार घडू नये म्हणून कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये अजूनही भीती असून तणावाची स्थिती कायम आहे. दरम्यान, बीड, पुण्यासह संपूर्ण राज्यातच हिंसाचार, अत्याचार आणि मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात हिंसाचार भडकल्याने भाजप-मिंधे सरकारच्या काळात सुसंस्कृत महाराष्ट्र ‘मणिपूर’च्या वाटेवर चालल्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

औरंगजेबाची कबर उखडून टाकावी या मागणीसाठी सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. याचा राग मनात धरून काही समाजपंटकांनी मोर्चेकऱ्यांविरोधात जोरदार घोषणा देत दगडफेकही केली. त्यामुळे नागपूरमध्ये दंगलसदृश स्थिती निर्माण झाली. ही स्थिती आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाल्याने पोलिसांनी दोन्ही गटांना थोपवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र दोन्ही गट शांत होण्याऐवजी आणखीनच आक्रमक झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगफेक करीत रस्त्यावरील वाहने जाळण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे जमावाने पोलिसांवरही जोरदार दगडफेक केली. यामुळे नागपूरमध्ये दंगलसदृश स्थिती निर्माण झाली.

150 जणांवर गुन्हे दाखल

संचारबंदी लागू असल्यामुळे रस्त्यांवर वर्दळ रोडावली आहे.  सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असली तर पोलिसांनी खबरदारी म्हणून 150 जणांविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आले आहे.

3 उपायुक्तांसह 33 पोलीस जखमी

नागपूरमधील दंगल थोपवण्यासाठी जिगरबाजपणे काम करताना तीन पोलीस उपायुक्तांसह 33 पोलीस जखमी झाले. एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला, तर पाच नागरिक या हिंसाचारात जखमी झाले. यापैकी तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. दोन जण रुग्णालयात आहेत, त्यापैकी एकजण आयसीयूमध्ये आहे.

इंटरनेट बंद80 जणांना अटक

हिंसाचार भडकू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, तर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून 80 जणांना ताब्यात घेतले. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट रडारवर असून 1800 अकाऊंटची तपासणीही करण्यात आली. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर अशा 11 भागांत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जंगलाचा नियम

n बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या.

एन पेरभणी संविधान अवमान प्रकरणारून दोन गटांत दंगल. पोलीस कोठडीत एकाचा मृत्यू.

n बदलापूर चिमुकलीवर शाळेतच शिपायाकडूनच अत्याचार. पोलिसांकडून आरोपीचा एन्काऊंटर.

एन पुणे स्वारगेट एसटी आगारातच तरुणीवर बलात्कार. पुण्यात दिवसाढवळय़ा कोयता गँगची दहशत.

n कोल्हापूर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी रहिवाशांना विश्वासात न घेता कारवाई केल्याने तणाव.

n विशाळगड – परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण. वाहने जाळली.

फडणवीसांचा दावा दंगल पूर्वनियोजित

मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन करताना ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. दंगलीबाबत संपूर्ण माहिती त्यांनी सभागृहाला दिली. राज्यात कोणीही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल. तसेच जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. राज्यातील नागरिकांनी शांतता आणि संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दंगल घडली त्या भागात पोलिसांना एक ट्रॉली भरून दगड मिळाले. दंगलखोरांनी दगड जमा करून ठेवल्याचे आढळले. शस्त्रास्त्र मोठय़ा प्रमाणावर होती. ठरावीक घरे आणि कार्यालयांना दंगलखोरांनी सुनियोजितपणे लक्ष्य केले, असे फडणवीस म्हणाले.

‘छावा’ चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला, पण त्या चित्रपटामुळे लोकांच्या मनातील भावना प्रज्वलित झाल्या, औरंगजेबाबद्दलचा राग प्रकट होऊ लागला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments are closed.