NCP : आषाढी एकादशीपर्यंत दादा – ताई एकत्र येणार म्हणणाऱ्या मिटकरींना प्रांताध्यक्षांच्या कानपिचक्या
पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकत्रिकरणाचे वारे वाहत आहेत. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच एकत्र येतील अशी शक्यता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत ताई आणि दादा एकत्र येऊ शकतात असे वक्तव्य मिटकरींनी केले आहे. त्यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.तर अजित पवार गटाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेंनी मिटकरांनी कानपिचक्या दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर बोलत असताना म्हटले की, पांडुरंगाची ईच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. येत्या 10 तारखेला पक्षाचा मेळावा आहे, तोपर्यंत वाट बघा. मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याची शक्यताही मिटकरींनी व्यक्त केली. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच एकत्र येतात का, अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान सोमवारी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एका मंचावर येणार आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीची निमित्ताने काका – पुतणे एकत्र येणार आहेत.
कोण कुठे जाणार हे पक्ष ठरवेल – सुप्रिया सुळे
राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबद्दल विचारण्यात आले. त्या म्हणाल्या, याबद्दलचा निर्णय काही माझा नाही. कोण कुठे जाणार हे ठरवण्याचा अधिकार पक्षाचा आहे. शरद पवारांचा आहे. शरद पवारांचे राजकारण सर्वांना माहीत आहे. शरद पवार जो निर्णय घेतील, तो लोकशाही मार्गाने ते निर्णय घेत असतात. त्या संदर्भात ते सगळ्यांसोबत चर्चा करतात. कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, ते मला कळेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अमोल मिटकरींनी व्यक्त केलेल्या इच्छेवर त्या म्हणाल्या की अजित पवार आणि मी बहीण भाऊ आहोत. लहानपणापासून सोबत आहोत. मिटकरींची जी इच्छा आहे त्याबद्दल मी आभारी आहे.
अंतिम निर्णय अजित पवार घेतील – मिटकरी
खासदार सुप्रिया सुळे यांनी अमोल मिटकरींनी व्यक्त केलेल्या इच्छेबद्दल आभार व्यक्त केल्यानंतर अमोल मिटकरींनी म्हटले की, सुप्रिया ताईंनी आभार मानण्याचं काम नाही. कारण त्या खुप मोठ्या आहेत. दादा आणि ताई यांचं भावा-बहिणीचं नातं आहे. दोन्ही पक्ष एकत्र असले पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. अंतिम निर्णय अजित पवारच घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असणार आहे.
अमोल मिटकरींना कानपिचक्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर संतप्त झाले. सुनील तटकरे म्हणाले की, राज्यातील जनतेने आमच्या पक्षावर शिक्कामोर्तब केला आहे. आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत आणि आता एनडीएसोबत सरकारमध्ये आहोत. त्यामुळे यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही. ज्यांना सोबत यायचे आहे त्यांनी यावं, त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. अमोल मिटकरी यांनी यापुढे बोलताना जपून बोलावं. पक्षातील वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली तर त्यानंतर इतर कोणी त्याच्यावर बोलण्याची गरज नाही, अशा कानपिचक्या प्रांताध्यक्षांनी आमदार मिटकरींना दिल्या.
Comments are closed.