हिंदीच्या अट्टाहासापायी विद्यार्थ्यांचे नुकसान का करताय? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा शिकणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे हिंदीच्या अट्टाहासापायी विद्यार्थ्यांचे नुकसान का करताय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे तसेच सरकारने त्रिभाषा सुत्राचा पुनर्विचार करावा असेही सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याचा निर्णय घेतला असून मागच्या दाराने शिक्षणात त्रिभाषा सुत्र घुसडले आहे. यामुळे मराठी भाषक जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.

सर्वात काळजीची बाब म्हणजे त्रिभाषा सुत्राबाबतचा हट्ट पुरविण्यासाठी कार्यानुभव, खेळ आणि कला या विषयांसाठीचे तास कमी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरावे यासाठी हे तास अतिशय महत्त्वाचे आहेत.

परंतु ते कमी करण्यात येत असल्याने शासनाचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत नेमके काय धोरण आहे असा प्रश्न उपस्थित होतो. माझी शासनाला विनंती आहे की कृपया विद्यार्थ्यांना गरजेचे असणाऱ्या या विषयाचे तास कमी करु नयेत. तसेच जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेता त्रिभाषा सुत्राचा पुनर्विचार करावा अशी मागणीही सुळे यांनी केली आहे.

Comments are closed.