ऑस्ट्रेलियाने वनडेत टीम इंडियाची जीरवली अन् आता टी20 मालिकेआधी स्टार खेळाडू जखमी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेनंतर आता 29 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका (Ind vs Aus T20 Series) खेळली जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली नुकताच आशिया कप जिंकून परतलेला भारतीय संघ या मालिकेत कठीण परीक्षेला सामोरा जाणार आहे. मात्र या मालिकेच्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत, आणि आता वनडे मालिकेदरम्यान आणखी एका खेळाडूच्या दुखापतीची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने सिडनी वनडेनपूर्वी नितीश कुमार रेड्डी जखमी (Nitish Kumar Reddy Injured) झाल्याची माहिती दिली आहे.
नितीश रेड्डीने पर्थमध्ये वनडेत पदार्पण केलं, पण…
नितीश रेड्डीने पर्थमध्ये आपला वनडे पदार्पण सामना खेळला होता आणि त्यानंतर तो अॅडलेड वनडेमध्येही संघाचा भाग होता. मात्र, सिडनी वनडेसाठी त्याला संघातून वगळण्यात आले. बीसीसीआयने एक्सवर पोस्ट करताना सांगितले की, दुसऱ्या वनडेदरम्यान नितीश रेड्डीला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळत नाही.
बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, “दुसऱ्या वनडेदरम्यान नितीश रेड्डीच्या डाव्या पायाच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली. त्यामुळे तो सिडनी वनडेसाठी उपलब्ध नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर दररोज लक्ष ठेवून आहे आणि ती सतत मॉनिटर केली जात आहे.”
🚨 अपडेट 🚨
नितीश कुमार आर एडीला ॲडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान डाव्या बाजूच्या क्वाड्रिसेप्सला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तिसऱ्या वनडेसाठी निवडीसाठी अनुपलब्ध होता. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक दररोज त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.#TeamIndia | #AUSWIN | @NKReddy07 pic.twitter.com/8vBt1f5e5f
— BCCI (@BCCI) 25 ऑक्टोबर 2025
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत नितीशकडून संघाला ऑलराउंडर म्हणून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्याची ही दुखापत टीम इंडियासाठी वाईट बातमी ठरू शकते. कारण अशा प्रकारच्या स्नायू दुखापतींना सामान्यतः दोन आठवडे तरी लागतात पूर्ण बरे व्हायला. त्यामुळे नितीश रेड्डीच्या टी20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.
भारताचा टी-20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्नाधर), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वाशिंगटन सुंदर.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.