ओआयसीची सिंधू पाण्यातील वादात प्रवेश

तुर्कीमधील 57 इस्लामिक देशांची संघटना पाकिस्तानच्या पाठीशी

वृत्तसंस्था/ इस्तंबूल

इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेने (सीएफएम) भारत-पाकिस्तानच्या सिंधू जलवाटप करार सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. तुर्कीमधील इस्तंबूल येथे झालेल्या 57 इस्लामिक देशांच्या ओआयसी संघटनेच्या बैठकीत दोन्ही बाजूंना सिंधू जलवाटप करारासह (आयडब्ल्यूटी) पाकिस्तान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय करारांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओआयसीची ही विनंती या मुद्यावर पाकिस्तानच्या भूमिकेला पूर्णपणे समर्थन देते.

‘सीएफएम’ने जारी केलेल्या निवेदनात अलिकडच्या काळात दक्षिण आशियात झालेल्या लष्करी वाढीबद्दल तीव्र चिंता वाटते, असे म्हटले आहे. या चिंतेमध्ये पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी भारताने केलेले हल्ले समाविष्ट आहेत. दोन्ही बाजूंनी जास्तीत जास्त संयम बाळगण्याची आणि प्रदेश अस्थिर करू शकतील अशा कृती टाळण्याची गरज आम्ही अधोरेखित करतो. सिंधू कराराचा संदर्भ देत, सदर करार मोडला जाऊ नये आणि दोन्ही बाजूंनी त्याचे पालन करावे, असे सुचविण्यात आले आहेत.

इस्तंबूल येथे झालेल्या इस्लामिक देशांच्या दोन दिवसांच्या बैठकीत ‘सीएफएम’ने सिंधू कराराव्यतिरिक्त काश्मीर मुद्यावर पाकिस्तानचा आवाज प्रतिध्वनीत केला आहे. आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, ओआयसीच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार काश्मिरी लोकांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराला पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार देखील ‘ओआयसी’च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी तुर्कीला गेले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर देखील दार यांच्यासोबत तुर्कीला गेले होते. मुनीर यांनी तुर्कीमध्ये यजमान देशाचे अध्यक्ष रेसेप एर्दोगान यांची भेट घेतली. बैठकीनंतरच्या विधानावरही या बैठकांचा प्रभाव दिसून येतो.

सिंधू जलवाटप करारासंबंधी वाद

1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानने सिंधू जलवाटप करारावर स्वाक्षरी केली होती. या करारात भारत आणि पाकिस्तानमध्ये नद्यांच्या पाण्याच्या वाटपाचे नियम मांडले आहेत. 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने या करारातून माघार घेत पाकिस्तानचे पाणी थांबवण्याचे जाहीर पेले. पाकिस्तानने यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना भारताने करारातून माघार घेतल्यास युद्धाची धमकी दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. आता इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) यावर एक निवेदन दिले आहे.

हा करार काय आहे?

सिंधू जलवाटप करार हा भारत आणि पाकिस्तानमधील नद्यांचे पाणी विभागतो. सहा दशके जुन्या या करारात सिंधू, झेलम आणि चिनाबचे पाणी पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच वेळी, रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी भारताला देण्यात आले आहे. करार आणि जागेची तपासणी याबाबत दोन्ही देशांमधील चर्चेची तरतूदही या करारात आहे.

Comments are closed.