परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात शुक्रवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (वय – 28, रा. कांची, ता. नाशिक) हा आपल्या मित्रांसह कारने (एमएच 15 जेएच 0516) गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवली आणि त्याचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली.
या भीषण अपघातात रोहित संतोष भालेकर (वय – 28, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा संपत आव्हाड (वय – 33, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डेरिंगे (वय – 36, रा. पळसे, नाशिक) तसेच चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूण येथील पथकाने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक इर्शाद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल खोंदल व नटे यांनी तत्परतेने मदतकार्य केले. या वेळी अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.
Comments are closed.