पाकिस्तानने पुन्हा मोठ्या नुकसानाची कबुली दिली
सौदी अरेबियासमोरही केली होती साहाय्य याचना
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून भारताने आमची जबर हानी केली, अशी कबुली पाकिस्तानने पुन्हा एकदा दिली आहे. पाकिस्तानचे उपनेते इशाक दर यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या संवाद कार्यक्रमात भाग घेताना ही कबुली दिली. इतकेच नव्हे, तर भारताला हल्ले थांबविण्यास सांगा, अशी मनधरणी पाकिस्तानने केवळ अमेरिकेचीच नव्हे, तर सौदी अरेबियाचीही केली होती, असे त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. नूर खान आणि शोरकोट येथील वायुतळ भारताने उध्वस्त केले, अशीही माहिती त्यांनी या कार्यक्रमात दिल्याचे दिसून येत आहे.
4 जूनलाही पाकिस्तानने ही कबुली दिली होती. भारताने पाकिस्तानची जी हानी झाल्याचे स्पष्ट केले होते, त्यापहीपेक्षा ती जास्त झाली आहे, असे पाकिस्तानने दिलेल्या या दोन्ही कबुलींवरुन स्पष्ट होत आहे. पाकिस्तानचे 11 वायुतळ आणि लष्करी आस्थापांची प्रचंड हानी केल्याची माहिती भारताच्या सैन्याधिकाऱ्यांनी ‘सिंदूर’ अभियाच्या वेळी दिली होती. पण पाकिस्तानने दिलेल्या कबुलीप्रमाणे भारताने 11 नव्हे, तर 19 तळ उध्वस्त केले आहेत.
ही तर सामर्थ्यासमोर शरणागती
पाकिस्तानचे उपनेते दर यांची कबुली म्हणजे त्यांनी भारताच्या सामर्थ्यासमोर पत्करलेली शरणागतीच आहे. भारताने पाकिस्ताची प्रचंड हानी केली आहे, हे आता अधिकृतरित्या सिद्ध झाले आहे. आपल्या सुरक्षेची मानहानी पाकिस्ताने स्वत:च्या तोंडून कबूल केली आहे. तसेच हे भारताच्या शक्तीला पाकिस्तानने दिलेले अधिकृत प्रमाणपत्रच आहे, अशी खोचक टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली आहे.
सत्याच्या बाँबसमोर पाकिस्तान धाराशायी
उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकपासून ‘सिंदूर’ अभियानापर्यंत प्रत्येक वेळी पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यांचा इन्कार केला होता. आपली काहीच हानी न झाल्याची फुशारकीही मारली होती. तथापि, आता त्या देशाला सत्य स्वीकारावे लागले आहे. सत्याच्या या बाँबसमोर पाकिस्तानचा खोटारडेपणा धाराशायी झाला आहे, असेही आता पाकिस्तानच्याच तोंडून स्पष्ट होत आहे, हे उत्तम आहे, अशी टीकाही अमित मालवीय यांनी सोशल मिडियावर केली आहे.
Comments are closed.