Passengers cheated by keeping very few seats for reservation of special trains for Konkan
(Konkan Ganeshotsav) मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. तिथे जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून कोकणासाठी विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली जाते. तसेच, कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या तिकीट आरक्षणाच्या तारखाही जाहीर केल्या जातात. यंदा आजपासून (सोमवार) बुकिंग सुरू झाले असले तरी, ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सकाळी 8 वाजता बुकिंग सुरू झाल्याबरोबर अवघ्या तीन मिनिटांत ते फुल्लही झाले. याचा ठपका जरी तिकीट दलालांवर ठेवला जात असला तरी, ही रेल्वेचीच ‘विशेष फसवेगिरी’ असल्याचे समोर आले आहे. त्यातही तिकीट न मिळालेल्यांना ‘खेद’ व्यक्त करण्याचा आगंतुकपणाही केला जातो.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. हे लक्षात घेऊन याही वर्षी कोकण रेल्वेने गणपतीसाठी स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच रेल्वेने गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून तिकीट आरक्षित करण्याचा कालावधी निम्म्यावर आणला आहे. पूर्वी 120 दिवस आधी बुकिंग करता येत होते, नंतर 90 दिवस आणि आता फक्त 60 दिवसांचा कालावधी मिळतो. (Passengers cheated by keeping very few seats for reservation of special trains for Konkan)
यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टला म्हणजे मागील वर्षीपेक्षा लवकर साजरा होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने दरवर्षीप्रमाणे यावेळी 250हून अधिक गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे चाकरमानी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आधी दोन दिवस कोकणात जात असतात. त्यामुळे 25 आणि 26 ऑगस्टपर्यंत कोकणात पोहचण्यासाठी गाड्यांचे आरक्षण करण्याची चाकरमान्यांची धडपड सुरू आहे. रेल्वेनेही 23 जून ते 4 जुलै या दरम्यान बुकिंगची व्यवस्था केली आहे. पण आज, सोमवारपासून आरक्षणाला सुरुवात झाली असली तरी, अवघ्या तीन मिनिटांतच बुकिंग फुल्ल झाल्याचा मेसेज इच्छुक चाकरमान्यांच्या मोबाईलवर खणखणला, सोबतच याबद्दल रेल्वेने खेदही व्यक्त केला. सर्वसामान्य चाकरमान्यांना मात्र दरवर्षीप्रमाणे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची शंका आली.
हेही वाचा – Bhaskar Jadhav : मी सगळ्यांशी बोलून…; नाराजीमुळे चर्चेत असलेल्या भास्कर जाधवांनी स्पष्टच सांगितले
मात्र, यात रेल्वेचीच ‘विशेष हुशारी’ असल्याचे समोर आले आहे. कोकणात जाण्यासाठी आजघडीला मांडवी, तेजस, कोकणकन्या, तुतारी, राज्यराणी एक्स्प्रेस तसेच वंदे भारत या गाड्या उपलब्ध आहेत. यापैकी वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवसांऐवजी आता केवळ तीन दिवसच चालवण्यात येत आहेत. मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी वंदे भारत एक्स्प्रेस आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी तीनच दिवस मुंबईहून सोडली जाते. तेजसचीही तशीच स्थिती आहे. ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी मुंबईहून सुटते.
या सर्व गाड्यांना साधारणपणे 15 ते 18 डबे असतात. तर, यातील बहुतांश गाड्यांमध्ये जनरल, एसी, टू टियर आणि थ्री टियर अशी आसनव्यवस्था आहे. म्हणजेच, आसनव्यवस्थेनुसार एका डब्यात 72 प्रवासी प्रवास करू शकतात आणि त्याआधारे 15 डब्यांच्या गाडीत सरासरी 1000 नागरिकांना रिझर्व्हेशन मिळते. पण जेव्हा ऑनलाइन बुकिंग खुले होते, तेव्हा मात्र केवळ पावणेतीनशे (273) तिकिटे उपलब्ध केली जातात. कोकणकन्या एक्स्प्रेसचे उदाहरण द्यायचे झालेच तर, टू टायर कोचमध्ये 17 सीट, 3 टायर कोचमध्ये 127 तर, स्लीपर कोचमध्ये 129 जागा अशी केवळ 273 तिकिटे रिझर्व्हेशनच्या वेळी मिळतात. मांडवी गाडीमध्ये अशा प्रकारे 229 तिकिटे रिझर्व्हेशनसाठी उपलब्ध केली जातात. म्हणजेच, 23 जून ते 4 जुलै या 12 दिवसांत कोकणकन्येची 3276 आणि मांडवीची 2748 अशी साधारणपणे सहा हजार तिकिटे ऑनलाइन उपलब्ध केली जातात. मुंबई आणि परिसरात लाखांच्या संख्येत असलेल्या कोकणवासीयांच्या दृष्टीने ही संख्या नगण्यच आहे. अशातच काही तिकिटे व्हीआयपींसाठी, काही तत्काळसाठी आणि काही अचानक कोणाची तरी चिठ्ठी घेऊन येणाऱ्यांसाठी असतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली.
हेही वाचा – Nitesh Rane : …त्यावर आझमीसारखं कार्ट काहीच बोलत नाही; एकेरी उल्लेख करत राणेंची सडकून टीका
याशिवाय, आता वेटिंग लिस्टच्या नियमांतही बदल करण्यात आला आहे. आता नव्या नियमानुसार स्लीपर कोचपासून एसी कोचपर्यंत सर्व श्रेणींमध्ये केवळ 25 टक्के अतिरिक्त वेटिंग लिस्टचे तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या चाकरमान्यांच्या हाती कन्फर्म तिकीट पडेपर्यंत चिंताग्रस्त राहण्याशिवाय पर्याय नाही. कोकणाला जाणाऱ्या रस्त्यांची स्थिती आणि नियमित तसेच विशेष गाड्यांचे आरक्षण हे विघ्न दूर झाल्यानंतरच विघ्नहर्त्याच्या आगमनाचा आनंद चाकरमान्यांना मिळतो, हीच वस्तुस्थिती आहे.
My Mahanagar चे प्रश्न –
- आठवड्यातून सहा दिवस चालणारी वंदे भारत तीन दिवसच का चालवली जाते?
- आठवड्यातून सहा दिवस चालणारी तेजस एक्स्प्रेस तीन दिवसच का चालवली जाते?
- गाडीत हजाराहून अधिक सीट असताना केवळ 273 तिकिटेच का उपलब्ध?
Comments are closed.